अतिवृष्टीने चिकू पिकाचे नुकसान 
मुख्य बातम्या

अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात चिकूचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन

मुंबई : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील मुख्य फळपीक असलेल्या चिकूचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे लहान-मोठी फळे व नवीन कळ्या संपूर्णपणे गळून पडल्या आहेत. शेती आणि पिकांच्या या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने चिकू उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अतिवृष्टीमुळे खरिपातील भात, नागली, उडीद, तूर आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.  

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील घोलवड, बोर्डी, वाणगाव, डहाणू हा बागायती पट्टा चिकूसाठी प्रसिद्ध आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यांत दहा हजार हेक्टर तर पालघर तालुक्यात सात हजार हेक्टर क्षेत्रात चिकूचे उत्पादन घेतले जाते. येथील गोड आणि रसाळ चिकूला देशभरातून मागणी असते. मात्र, गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका चिकू पिकाला बसला आहे.

जून महिन्यात चक्रीवादळामुळे चिकू तसेच आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शासन दरबारी विनंती, आर्जवे करूनही त्याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही, याकडेही शेतकरी लक्ष वेधत आहेत. त्याचसोबत यंदा जाचक निकषामुळे चिकू उत्पादक पीक विम्याच्या लाभापासूनही वंचित राहण्याची चिन्हे आहेत. यावर्षी चिकूला ९० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि २० मिलिमीटर पाऊस असे दुहेरी ट्रिगर ठेवल्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त होते.

विक्रमगड, वाडा तालुक्यांतही शेतीचे मोठे नुकसान विक्रमगड तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी भरल्याने भाताची रोपे पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे भातशेतीला धोका निर्माण होऊन भातपिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विक्रमगड तालुक्यासह खुडेद, ओंदे, शील, झडपोली, केव, म्हसरोली, सजन आदी भागांतील शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत. तर काहींच्या शेतात माती आल्याने भात पिके गाडली आहेत. अनेकांची भातशेती पाण्याखाली तसेच जास्त पावसामुळे लागवडीखालील भातरोपे कुजण्याची शक्यता असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुसळधार पाऊस तसेच वादळी वाऱ्याने झोडपून काढल्याने वाडा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आणि भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. त्यासोबतच भागात केळी, आले, बटाटा, कांदा, कोबी, फ्लॉवर, ऊस, हळद, टोमॅटो आदी पिके घेतली जातात.

`चिकू पुनरुज्जीवन योजना सुरू करा` विम्याचे निकष ठरवताना चिकू उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. जिल्ह्यातील चिकू संशोधन केंद्राकडून पीक पाहणीच्याबाबतीत दुर्लक्ष होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी चिकू पुनरुज्जीवन योजनाही बारगळली असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही योजना सुरू करावी, अशीही मागणी शेतकरी करीत असल्याची माहिती राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी दिली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध

Jalgaon Flood: जळगावमधील पाचोऱ्यात पावसामुळे पूरस्थिती; गिरीश महाजनांचे प्रशासनाला मदतीचे निर्देश

Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टी

E-Peek Pahani : खरिपातील ४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांना फटका

SCROLL FOR NEXT