मुंबई ः राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे राष्ट्रीयदिनी सामूहिक वाचन होणार आहे. येत्या २६ जानेवारीपासून राज्यात संविधानविषयक जनजागृतीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
श्री. मुश्रीफ म्हणाले, की प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन या दिवशी ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. या स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक हे संविधानातील उद्देशिकेचे वाचन करतील. नागरिकांमध्ये आपल्या भारतीय संविधानाविषयी जागृती व्हावी, आपल्या हक्क आणि कर्तव्यांविषयी त्यांना माहिती व्हावी. तसेच आपली लोकशाही अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
या संदर्भातील परिपत्रक सर्व जिल्हा परिषदांना पाठविण्यात येत असून २६ जानेवारीपासून राज्यातील २७ हजार ८७४ ग्रामपंचायती, ३५१ पंचायत समित्या आणि ३४ जिल्हा परिषदांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन लोकशाही अधिक बळकट करण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.