सोलापूर जिल्ह्यात पावसाची संततधार
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २१) पावसाची सर्वदूर रिपरिप सुरूच होती. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जलसाठे होण्याच्यादृष्टीने आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरणाकडून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरूच असल्याने उजनी धरणाची पाणीपातळी ६३ टक्क्यांपर्यंत पोचली आहे.
गेल्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा सुरवात केली आहे. सध्या खरिपातील पिकांना या पावसाने दिलासा दिला आहे. विशेषतः सोयाबीन, तुरीला या पावसाचा चांगला फायदा झाला आहे. मूग, उडीद, मटकी मात्र आता हातच्या गेल्या आहेत; पण उशिरा का होईना पावसाने सुरवात केल्याने समाधान आहे. सोमवारच्या दिवसभराच्या रिपरिपीनंतरही मंगळवारी पुन्हा पावसाने आपली रिपरिप कायम ठेवली. सकाळी सूर्यदर्शनही काहीसे उशिराच झाले; पण पुन्हा पावसाने सुरवात केली. जिल्ह्यतील मोहोळ, बार्शी, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, माळशिरस असा सर्वदूर हा पाऊस पडत होता. पण त्यात जोर नव्हता. सध्या पावसामुळे शेतीची कामेही थांबली आहेत. पडणारा हा पाऊस आणखी मोठा हवा आहे, त्याशिवाय विहिरी आणि बोअरच्या पाणी पातळीत वाढ होणार नाही.
दरम्यान, पुणे जिल्ह्याकडील धरणातून येणारे पाणी अखंडपणे सुरू असल्याने सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी दुपारी उजनी धरणाची पाणी पातळी ६३ टक्क्यांपर्यंत पोचली. धरणाची एकूण पाणी पातळी ४९५.१० मीटरपर्यंत राहिली. धरणातील एकूण साठा २७५१.५१ दशलक्ष घनमीटर आणि त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ९५१.७० दशलक्षघनमीटर एवढा होता. दौंडकडील ३५२१६ क्युसेक इतका होता. तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण लवकरच ७५ टक्क्यांपर्यंत जाणार आहे.