crop damage
crop damage  
मुख्य बातम्या

काही तासांतच शेतीचं होत्याचं नव्हतं झालं

टीम अॅग्रोवन

नांदेड : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. तर ओढ्याकाठच्या जमिनीही खरडून कायमची हानी झाली. काही तासांत होत्याचे नव्हते झाले, अशी व्यथा मांडत सततच्या संकटाने जगायच कसे, असा सवाल तेलंगणा सीमेलगत असलेल्या आदमपूर, केसराळी, सगरोळी (ता. बिलोली) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला.  नांदेड जिल्ह्यात सात लाख ५९ हजार ४०७ हेक्टर क्षेत्र खरिपासाठी प्रस्तावित क्षेत्र आहे. यंदा जूनमध्ये चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणीला सूरुवात केली. परंतु यानंतर मात्र पावसाने कहर केला. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १७० टक्के, तर ऑक्टोबरमध्येही १३४ टक्के पाऊस झाल्यामुळे खरिपातील हंगामी पिकांसह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  सप्टेंबर महिन्यात २३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या काळात सोयाबीन, ज्वारी, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर ऑक्टोबरमध्येही परतीच्या पावसाने जोरदार दणका दिला. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह वेचणीला आलेल्या कपाशीचे नुकसान अधिक प्रमाणात झाले. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९१७.५० मिलिमीटरनुसार १०५.५८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.  यंदा आदमपूर येथील मधूकर अनंतराव कुलकर्णी यांनी २७ एकरमध्ये सोयाबीनची पेरणी केली. यासाठी त्यांना एकरी चौदा हजार रुपये खर्च आला. पीक चांगले आल्याने उत्पादन चांगले येईल असे वाटत असताना १५ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर अतिवृष्टी झाली. यामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. पिकांची काढणी केली, परंतु बुरशीमुळे ते डागी झाले. एकरी दोन क्विंटल उत्पादन येत आहे. २७ एकरचा खर्च साडेतीन लाख आहे. तर उत्पादन ५५ ते ६० क्विंटल निघाले, सोयाबीन डागी असल्यामुळे तीन हजार रुपयांचा दर मिळेल. यातून एक लाख ८० हजार रुपये होतील. अशाप्रकारे एक लाख सत्तर हजाराचा घाटा हाईल, असे मधूकर कुलकर्णी यांनी सांगितले. तर येथीलच चंद्रकात हनमंतराव पाटील यांच्याही सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

पाच लाख ६४ हजार हेक्टरचे नुकसान नांदेडमध्ये एक जून ते २२ ऑक्टोबर कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे सोळा तालुक्यातील सात लाख ४४ हजार शेतकऱ्यांच्या पाच लाख ६४ हजार ५१९ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. हंगामी  पिकांसह बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी लागणाऱ्या ३८४ कोटी ८० लाख रुपयांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शासनाकडे केली आहे.

प्रतिक्रिया केसराळी येथील सोयाबीन, तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांचा लागवड खर्चही यंदा निघणार नाही. - दीपक शिंदे,  शेतकरी, केसराळी ता. बिलोली.

अतिवृष्टीमुळे आमच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने भरपाई द्यावी, तसेच विमा कंपनीकडून परतावा मिळाला तर बरे होईल. - व्यंकट पाटील सिदनोड, शेतकरी, सगरोळी (ता. बिलोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT