खानदेशात पावसाची विश्रांती
जळगाव : जळगावसह नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात मंगळवारी (ता.२१) सायंकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या २४ तासांत कुठेही जोरदार पाऊस झालेला नसल्याची माहिती मिळाली. बुधवारी (ता.२२) सकाळी आठपर्यंत प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार कुठेही अतिवृष्टी झाली नाही.
जिल्ह्यात मंगळवारी दुपारपर्यंत संततधार सुरूच होती. मागील तीन दिवस संततधार पाऊस झाल्याने तोडणीवर आलेल्या मुगाच्या शेंगा फुटून त्यात दाणे अंकुरले आहेत. शेतांमध्ये चिखल असल्याने मूग तोडणी करायला अडचण येत आहे. मंगळवारी रात्री काही भागांचा अपवाद वगळता पाऊस झाला नाही. बुधवारी सकाळी ऊन सावल्यांचा खेळ सुरू झाला. अनेक ठिकाणी कापूस पिकावर फवारणीची कामे हाती घेण्यात आली. हलक्या, मुरमाड शेतांमध्ये तण नियंत्रणाच्या कामाचीही तयारी झाली.
मंगळवारी सकाळी आठ ते बुधवारी सकाळी आठ दरम्यानच्या २४ तासात जिल्ह्यात पाचोरा येथे २१ मिलीमीटर, चाळीसगावात १८, जळगावात २२, चोपडा येथे २१, यावल येथे २०, रावेरात २१, जामनेरमध्ये २२, बोदवडमध्ये २८, भुसावळ येथे २० मिलीमीटर पाऊस झाला.
नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वातातील धडगाव, अक्कलकुवा येथे चांगला पाऊस झाला. पण तेथे अतिवृष्टी झालेली नाही. शहादा येथे २८, नंदुरबारात २२, तळोदा येथे २८, नवापुरात ३२ मिलीमीटर पाऊस झाला. धुळे जिल्ह्यातही गत २४ तासात शिरपूर, शिंदखेडा, साक्री येथे २० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मंगळवारी सायंकाळपासून नंदुरबार व धुळ्यातही पावसाने विश्रांती घेतली. मंगळवारी सायंकाळी तापी नदीवरील हतनूर धरणाचे ३२ दरवाजे उघडले होते. बुधवारी २४ दरवाजांमधून विसर्ग सुरू होता. गिरणा नदीवरील गिरणा धरणाचा साठा ४० टक्क्यांपर्यंत पोचल्याची माहिती मिळाली.