ग्रामपंचायत परिसरात प्लॅस्टिक वापरल्यास दंडात्मक कारवाई : डॉ. नरेश गिते
नाशिक : प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सुरवातीच्या टप्प्यात प्लॅस्टिकचा वापर न करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यापुढे ग्रामपंचायतींच्या परिसरात प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.
कारवाईबाबतचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे ग्रामीण भागात ग्रामपंचायत परिसरात प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (आरोग्य व ग्रामपंचायत) व ग्रामसेवक यांच्यावर आहे. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर याबाबतचे फलक लावण्यात येणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.
प्लॅस्टिकच्या वापराचे दुषपरिणाम, कायदा करण्यामागची कारणे, कारवाईसंबंधीची माहिती आदीविषयी फलक सर्वत्र लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत परिसरात प्लॅस्टिकबंदीचे फलक लावावेत, याबाबत जनजागृती करावी, प्लॅस्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी, शासकीय कार्यालयात प्लॅस्टिकचा वापर होणार नाही, यासाठी सूचना देण्यात याव्यात, तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आदी निर्देश पत्राद्वारे गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीची जबाबदारी : शेळकंदे ग्रामीण भागात प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. त्यानुसार सर्व तालुक्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत परिसरात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीची आहे. त्याबाबतच्या सूचना सर्व ग्रामपंचायतीना देण्यात आल्या आहेत, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी सांगितले.