कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची उदासीनता
सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आघाडी घेतली आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये त्याबाबत उदासीनता आहे. बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, एसबीआय या नामांकित बॅंका वगळता उर्वरित राष्ट्रीयीकृत बॅंकांची कर्जवाटपाची कामगिरी फारशी समाधानकारक नाही.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वारंवार याबाबत सूचना देऊनही बॅंकांना फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे या बॅंकांवर आता कारवाई होण्याची गरज आहे. कर्जवाटपामध्ये प्रामुख्याने आंध्रा बॅंक, कॅनरा बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, इंडस्टलंड बॅंक, कोटक महिंद्रा या बॅंका पिछाडीवर आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांना खरिपासाठी ६५ हजार ७८६ खातेधारकांना ८८६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १९ हजार ६४० शेतकऱ्यांना ३४० कोटी रुपयांचे कर्जवाटप आतापर्यंत झाले आहे.
जिल्ह्यातील १० खासगी बॅंकांना १० हजार १५७ शेतकऱ्यांना १५५ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यांनी आतापर्यंत ८ हजार ६३९ शेतकऱ्यांना १२१ कोटी रुपयांचे वाटप केले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ६७ हजार ६३१ शेतकऱ्यांपैकी २२ हजार ६१२ शेतकऱ्यांना १६६ कोटी रुपयांचे वाटप केले. जिल्हा बॅंकेतर्फे त्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. राष्ट्रीयकृत बॅंकांनी मात्र शासनाच्या कर्जवाटपाबाबतच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.