विसापूर, जि. सातारा : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने येरळा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. खटाव तालुक्यातील भूजलपातळी खालावल्यामुळे विहिरींनीही तळ गाठला आहे. पाण्याविना पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे पिण्यासाठी आणि सिंचनासाठी नेर तलावातील पाणी कालवा आणि नदीपात्रातून त्वरित सोडावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केली आहे. श्री. विधाते म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत पाऊस झाल्याने, तसेच जिहे- कठापूर योजनेची चाचणी करण्यासाठी सोडण्यात आलेल्या थोड्याफार पाण्यामुळे खटाव तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या नेर तलावात क्षमतेइतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने येरळा नदीकाठच्या गावांच्या पिण्याच्या आणि सिंचनाच्या योजना बंद पडू लागल्या आहेत. भूजलपातळी खालावल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना जगणे मुश्कील झाले आहे. उन्हाळी पिकांसह इतर बागायती पिके पाण्याविना सुकू लागली आहेत. नेर तलावातील पाणी मुख्य, डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे, तसेच येरळा नदीपात्रात सोडले, तर सिंचन आणि टंचाईची समस्या दूर होणार आहे. पिकांनाही जीवदान मिळणार आहे.’’ नेरमधील पाण्यामुळे पुसेगाव, खातगुण, भांडेवाडी, खटाव, कुरोली, भुरकवडी ते कुमठ्यापर्यंतच्या गावांना लाभ होणार आहे. त्यामुळे कृष्णा सिंचन विभागाने त्वरित निर्णय घेऊन नेर तलावातील पाणी सोडावे, अशी मागणी विधाते यांनी केली आहे. पाणी मागणी अर्ज आणि पाणी सारा भरून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.