नांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी विभाग- जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषिमित्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. २१ जून ते एक जुलै या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन ‘कृषी संजीवनी मोहीम’ साजरी करण्यात येईल,’’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.
जिल्ह्यात कृषी संजिवनी मोहिमेचा प्रारंभ चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांच्या उपस्थितीत अर्धापूर शिवारात सोमवारी (ता. २१) झाला. या वेळी शेतकरी सोनाजी सरोदे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
अशी असेल मोहीम...
सोमवारी (ता. २१) बीबीएफ लागवड तंत्रज्ञान (रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान) विषयी माहिती, मंगळवारी (ता. २२) बीजप्रक्रिया, बुधवारी (ता. २३) जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, गुरुवारी (ता. २४) कापूस एक गाव एक वाण, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान, शुक्रवारी (ता. २५) ‘विकेल ते पिकेल’, सोमवारी (ता. २८) `मनरेगा`अंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, मंगळवार (ता. २९) तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, बुधवार (ता. ३०) जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना आणि एक जुलै रोजी कृषी दिन आणि मोहिमेचा समारोप कार्यक्रम होईल.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.