जळगाव जिल्ह्यातील खरिपास पावसाची आस
जळगाव : जिल्ह्यात मागील १७ दिवसांपासून काही भागांचा अपवाद वगळला तर पाऊस नाही. पश्चिम भागातील अमळनेर, पारोळा, पाचोरा, भडगाव, जामनेर, चाळीसगाव भागात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पाऊस नसल्याने पिकांची स्थितीही नाजूक बनत आहे. मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे; पण पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहे.
पावसाचा खंड वाढल्याने शेतकऱ्यांनी दुष्काळी स्थितीचा धसका घेतला आहे. या भागातील खरिपाखालील एकूण क्षेत्र सुमारे तीन लाख हेक्टर आहे. चाळीसगाव, पाचोरा व भडगाव तालुक्यांतील प्रकल्प कोरडे आहेत. अमळनेर, जामनेरात मिळून २३ गावांमध्ये टंचाई आहे. एकूण ३३ टॅंकर सुरू आहेत. चाळीसगावात विहिरींनी गाठला तळ चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत सरासरी पावसाच्या केवळ ३७ टक्के पाऊस झाला आहे. महिन्यापासून काही भागात पावसाने दडी मारल्याने पावसाची प्रतीक्षा होत आहे. कळमडू परिसरात ज्वारी, मक्याचे पीक गेल्यात जमा आहे. वडाळा परिसरात पावसाअभावी पीक परिस्थिती नाजूक बनली आहे. मक्याच्या वाती झाल्या आहेत. अशीच स्थिती रोहिणी, खडकी परिसरात दिसून येत आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने पाणी कुठून आणायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाचोऱ्यातही स्थिती बिकट या तालुक्यातील बहुळा, अग्नावती, हिवरा या महत्त्वाच्या प्रकल्पात मृतसाठ्याच्या खाली पाणीसाठा आहे. अग्नावती प्रकल्पात कोरडा आहे. पिंपळगाव हरेश्वर, निंभोरी, वाणेगाव, मोंढाळा, वाडी-शेवाळे, वरखेडी परिसरात पावसाने तोंड फिरविले आहे. भडगावातही दुष्काळाची चाहूल भडगाव तालुक्यात मळगाव, कजगाव, गोंडगाव परिसरात पिके सुकू लागली आहेत. १५ जूनपर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत पेरणी झाली होती. पाऊस नसल्याने मूग, उडदामध्ये फूलगळ सुरू आहे. पिके हातची जातील, अशी भीती आहे.
पारोळा, अमळनेरात ही पेरणी ८०, तर जामनेरातही सुमारे ८५ टक्के झाली आहे. एरंडोल, धरणगाव येथेही पेरणी ८० टक्क्यांवर झाली आहे. ज्वारी, कडधान्यवर्गीय पिकांना फटका बसला आहे. पूर्व भागातील बोदवड, भुसावळातही पावसाची आस आहे.
कोरडे प्रकल्प मन्याड, बहुळा, हिवरा, अग्नावती, हातगाव-१, पिंप्री- उमरखेड, ब्राह्मणशेवगा, पिंपरखेड, कुंझर- २, वाघले- २, बोरखेडा, वलठाण, राजदेहरे, देवळी- भोरस, पथराड, घोडसगाव, उमरदे, पिंप्री-डाभुंर्णी, अटलगव्हाण, वाणेगाव- राजुरी, गाळण- २, दिघी- २, दिघी- ३, जामडी, बाणगाव, ओढरे, चितेगाव, कोदगाव व हातगाव या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे.