नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ८ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर विविध पिकांची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची बियाण्याची गरज लक्षात घेऊन विविध पिकांच्या १ लाख ४ हजार ७६३ क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाने महाबीज तसेच खासगी कंपन्यांकडे केली आहे.
यंदा कपाशी, तुरीच्या क्षेत्रात घट तर मूग, उडीद, सोयाबीनखालील क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी विविध ग्रेडचा २ लाख २५ हजार १९० टन खत साठा मंजूर झाला आहे.
२०१७ मध्ये खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ५ हजार ४७२ हेक्टर असताना ७ लाख ७६ हजार ६६४ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदाच्या खरीप हंगामामध्ये एकूण ८ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.
यामध्ये मूग ३० हजार, उडीद ३५ हजार, सोयाबीन ३ लाख १० हजार, कापूस २ लाख ५० हजार, ज्वारी १ लाख, बाजरी १००,भात १०००, मका २ हजार, तीळ ९००, सूर्यफुल ५००, भुईमूग १०० तसेच ६ हजार ३०० हेक्टरवर इतर पिकांचा समावेश आहे.
गतवर्षी एकूण १ लाख ५२ हजार ४६१ क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती. यंदा महाबीजकडे ६० हजार ८६० क्विंटल आणि खासगी कंपन्याकडे ४२ हजार २५३ क्विंटल अशी एकूण १ लाख ४ हजार ७५३ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारीचे ७२५०,भाताचे १७१, तुरीचे ३४८५.४०, मुगाचे १६६५, उडीदाचे १९४२.५, मकाचे १०४४, भुईमुगाचे ३९, सुर्यफुलाचे ५०, तिळाचे १३.५, सोयाबीनचे ७७ हजार ९१०, कापसाचे ९३०० तर इतर पिकांच्या १८९० क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने २ लाख ५८ हजार १०० टन खताची मागणी केली होती. परंतु २ लाख २५ हजार १९० टन खतासाठा मंजूर करण्यात आला. गतवर्षीचा एकूण ९० हजार ५५५ टन खतसाठा उपलब्ध झाला होता. त्यापैकी ३५७२ टन खताची विक्री झाली असून ८६ हजार ९८३ टन खतसाठा शिल्लक आहे, असे सूत्रांनी सांगितले.