कोल्हापूर : जिल्ह्यात सातत्यपूर्ण पावसामुळे खरीप काढणी पूर्णपणे ठप्प झाली आहे. दररोज पडणाऱ्या पावसामुळे येत्या आठ दिवसांत तरी वाफसा येणे शक्य नाही. यामुळे काढणीस आलेली पिके आणखी आठ ते दहा दिवस तरी कापणी व मळणीविनाच रहाण्याचीच शक्यता आहे.
विशेष करून सोयाबीनला याचा फटका बसण्यची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे माळरानावरही अनेक ठिकाणी पाझर फुटला आहे. यामुळे माळरानावरील व खडकाळ जमिनीतही अद्याप वाफसा आला नाही.
मध्यम व काळ्या प्रतीच्या जमिनीत तर अद्यापही पाणी साचून आहे. यामुळे पूर्ण पाऊस थांबल्यानंतर वाफसा येण्यास आठ ते दहा दिवस लागतील असे शेतकऱ्यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी वातावरणात जाणवणारा उष्मा व सायंकाळी दाटून येणारे ढग शेतकऱ्यांना खरिपाच्या काढणीपासून परावृत्त करत असल्याचे दृश्य जिल्ह्यात आहेत.
अनेक ठिकाणी वाटाही बंद असल्याने जरी कच्च्या वाफशावर कापणी केली, तर धान्य बाहेर काढण्याचीही अडचण शेतकऱ्यांना सतावत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थिीमुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तत्काळ काढणी करण्याचा विचार बाजूूला ठेवला आहे.
पावसामुळे अद्याप ज्या प्रमाणात सोयाबीन व भाताची काढणी अपेक्षित होती; त्या प्रमाणात ती सुरू झाली नसल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.
सोयाबीन शिवारातच तडकण्याचा धोका
सध्या पक्व झालेले सोयाबीन शिवारात उभे आहे. तर शेतात पाणी व चिखल असल्याने शेतात जाऊ शकत नसल्याची परिस्थिती बहुतांशी शिवारात आहे. कडक ऊन पडत असल्याने पक्व झालेले सोयबीन शिवारातच तडकण्याचा धोका निर्माण झाल्याने यंदा आगाप पेरणी केलेल्या सोयाबीनचे नुकसान अधिक होण्याची भीती व्यक्त होत आहे.