उत्तर महाराष्ट्रातील खरीप संकटात
नाशिक : उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सुरवातीला झालेल्या पावसाने पाठ फिरविल्याने विभागातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्यातील शेवटचे दोन आठवडे कोरडे गेल्याने आणि पावसाचे पुनरागमन लांबल्यास यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत अवघ्या ०.११ टक्के पेरण्या झाल्या आहेत. लवकर पाऊस न झाल्यास त्या पेरण्याही वाया जाण्याची शक्यता आहे.
मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पेरण्याही उरकून घेतल्या होत्या. मात्र, जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे पेरण्या वाया जावून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते.
नाशिक विभागात गेल्या वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत खरिपाच्या १६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र त्या केवळ ०.११ टक्क्यांवर आहेत. जूनअखेर उत्तर महाराष्ट्रात मागील वर्षीच्या वार्षिक सरासरीनुसार १८ टक्के तर यंदाच्या सरासरीनुसार अवघा १७ टक्के पाऊस झाला आहे.
तूर, मका व कापसाची लागवड यंदा केवळ मका, तूर व कापूस या पिकांची काही प्रमाणात लागवड झालेली आहे. बाजरी, भात, ज्वारी, नागली, मूग, उडीद, भूईमूग, तीळ, खुरसणी, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांची पेरणी अद्याप झालेली नाही. शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करीत आहेत. सुरवातीच्या पावसामुळे जमिनीची मशागत पूर्ण झालेली आहे.
विभागातील खरीप हंगाम पेरणी प्रगती (हेक्टर)
जिल्हा | तूर | मका | कापूस |
नाशिक | ० | ० | २.५० |
धुळे | ० | ० | ७८ |
नंदुरबार | ० | ० | ३१ |
जळगाव | २.७९ | १२.५० | ६०.३ |
एकूण | २.७९ | १२.५० | ७१४.५० |