नगर : जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षभरात (२०१६-१७) करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे ४५ हजार टीसीएम पाणीसाठा झाला आहे. या पाण्याचा सुमारे एक लाख आठ हजार चौदा हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. गतवर्षभरात गेल्यावर्षी निवडलेल्या २६८ गावांत जवळपास सव्वाआठ हजार कामे पूर्ण झाली असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्यावर्षी (२०१७-१८) २४१ गावे निवडली आहेत. या गावांसाठी दीडशे कोटींचा आरखडा केला असून, त्यात ८६०० कामे केली जाणार आहेत.
सध्या (२०१६-१७) या वर्षात निवडलेल्या २६८ गावांतील कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या गावांत आतापर्यंत ९९२० कामे सुरू झाली. त्यांतील ८३२५ कामे पूर्ण झालेली असून, १६०० कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांवर १६१ कोटी १७ लाख रुपये खर्च झाले आहेत. वर्षभरात केलेल्या सिंचनाच्या विविध कामांतून ५४ हजार टीसीएम पाणीसाठा झाला आहे. त्यातून एक लाख आठ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल, असा कृषी विभागाचा दावा आहे.
वर्षभरात केलेल्या कामांवर १६१ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, ‘गाळयुक्त जमीन, गाळमुक्त तलाव’ उपक्रमात लोक सहभागी होत असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.
प्रमुख झालेली कामे ः गाळ काढणे (सरकारी मशनरी) ः १०३९, लोकसहभागातून गाळ काढणे ः १९३, शेत बांध बंदिस्ती ः २२३२, शेततळे ः ११, गाव, पाझर, बंधारे दुरुस्ती ः २६५, सिमेंट नाला बांध ः ४५३, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध दुरुस्ती ः ६९,लुज बोल्डर स्ट्रक्चर ः २६२, माती नाला बांध दुरुस्ती ः ३६, विहीर, विंधन विहीर पुनर्भरण ः १६८५, नाला सरळीकरण ः ९७०, सलग समपातळी चर ः ३२५, जनावरे प्रतिबंधक चर ः १२.