धुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे जलपूजन
धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्यांतून वाहणारी बुराई नदी बारमाही प्रवाहित करण्यासाठी नदीवर बांधण्यात येणाऱ्या ३४ बंधाऱ्यांपैकी आतापर्यंत ३२ बंधाऱ्यांचे काम पूर्णत्वास आले असून, त्यांचे जलपूजन नुकतेच राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले.
बांधाऱ्यांमुळे परिसरातील भूजल पातळी उंचावण्यास मदत होईल. तसेच, शाश्वत जलसाठ्याची निर्मिती होईल, असे सांगितले जात आहे. बुराईनदी बारमाही करण्यासाठी ३४ बंधारे बांधण्यास गेल्या एप्रिलमध्ये सुरवात झाली होती. त्यापैकी दुसाने (ता. साक्री) येथे साकारलेल्या बंधाऱ्यातील जलपूजन रावल यांनी केले. या वेळी दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने आदी उपस्थित होते.
रावल म्हणाले, ‘‘बुराईनदी बारमाही करून शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या नदीवर ३४ बंधारे बांधण्याचे नियोजन केले. गेल्या एप्रिलमध्ये बुराईनदीची पायी परिक्रमा केली होती. त्यावेळेस पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्यांचे काम पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या होत्या.
‘‘सुमारे २४०० कोटी रुपये खर्चाच्या सुलवाडे- जामफळ योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे. त्याचे लवकरच भूमिपूजन होईल. चार वर्षांत ही योजना पूर्णत्वास येईल. त्यामुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील सुमारे दीड लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल,`` असेही रावल म्हणाले. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.