जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बीसाठी कृषी पत आराखडा जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आला आहे. सुमारे तीन हजार ३१८ कोटी १९ लाखांचे कर्जवाटप करण्याचे धोरण बॅंकर्स सल्लागार समितीतर्फे ठरविण्यात आले आहे. लवकरच बॅंकांना ते कळविले जाणार असल्याची सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.
खरीप हंगाम जवळ आल्याने पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खते, साधनसामुग्री यांची जुळवाजुळव होणार कशी, अशी चिंता शेतकऱ्यांना होती. त्यात दिलासादायक बाब म्हणजे १९ एप्रिलला लॉकडाउन शिथिल करीत कृषी संबंधित दुकाने खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाने साधारणतः मे च्या सुरवातीला शेतकऱ्यांना खते आणि बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. त्यात आता कर्जवाटप सुरू झाल्याने तेवढा दिलासा मिळत आहे.
जिल्ह्यात सुमारे तीन हजार ३१८ कोटी १९ लाख १८ हजार रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत खरीप कर्जाचे वाटप ४७ कोटी १२ लाख ३६ हजार झाले आहे. त्याची टक्केवारी १.२ आहे. विशेष म्हणजे, यंदा अद्याप बॅंकांच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक झालेली नाही. मात्र, ज्या शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जवाटप केले जात आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडीच लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यामुळे अडीच लाखांपर्यंतचे कर्जमुक्त झालेले शेतकरी कर्जासाठी पुन्हा पात्र ठरले आहेत.
कर्जवाटपाचे ठरवून दिलेले उद्दिष्ट | |
जिल्हा बॅंक | १ हजार २६३ कोटी २ लाख |
राष्ट्रीयीकृत बॅंका | १ हजार ५४८ कोटी ९९ लाख |
ग्रामीण बॅंका | ३१ कोटी २९ लाख |
खासगी बॅंका | ४७४ कोटी ८७ लाख |
एकूण | ३ हजार ३१८ कोटी १९ लाख |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.