भंडारा ः शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आर्थिक शिस्त जपली नाही, तर त्यांची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही. बड्या कंपन्यांप्रमाणे प्रत्येक खर्चाचा लेखाजोखा शेतकरी कंपन्यांना ठेवावा लागेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.
आसगाव (ता. पवनी) येथील चौरास शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांशी जिल्हाधिकारी दिवसे यांनी बुधवारी (ता.२४) संवाद साधला. उद्योग वाढविण्यासाठीच्या टिप्स त्यांनी या वेळी सभासदांना दिल्या.
जिल्हाधिकारी दिवसे म्हणाले, की नुसत्या चहा, कॉफीवरील खर्चदेखील दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यावरील खर्चाचे देखील नियोजन कंपनी प्रमुखांना करावे लागेल. त्यानंतरच खर्च, उत्पन्नाचा ताळेबंद जुळणार आहे. अशाप्रकारचा क्षुल्लक खर्च जरी कंपनीच्या खात्यात सातत्याने टाकत राहिला आणि तो दुर्लक्षित राहिला तर नुकसान सोसावे लागते. बड्या कंपन्यांनी अशाप्रकारची शिस्त जपल्यानेच त्या फायद्यात आहेत. अशाप्रकारची आर्थिक शिस्त शेतकरी कंपन्यांना गरजेची असल्याचे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कंपनी सभासदांशी संवाद साधताना त्यांना ‘बिजनेस टिप्स’ दिल्या. कृषी पदवीधर असल्याने जिल्हाधिकारी होण्यापूर्वी मी रोपवाटिका व्यवसायात होतो. या व्यवसायात नफ्याचे मार्जिन चांगले असल्याने अशाप्रकारच्या व्यवसायात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी लक्ष्य घालण्याचा सल्ला त्यांनी या वेळी दिला. रोपवाटीकेकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. त्यामुळे मजुरांवरील खर्च वाचतो, असेही सांगण्यास ते विसरले नाही.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे, उपविभागीय अधिकारी एस. पी. लोखंडे, चौरास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अनिल नौकरकर, पवनी तालुका कृषी अधिकारी ए. डी. गजभिये, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे कृषी पणन तज्ज्ञ योगेश खिराळे यांची या वेळी उपस्थिती होती.