नुकसानग्रस्त केळीच्या पंचनाम्यांकडे विमा कंपनीचे दुर्लक्ष
जळगाव : जून महिन्यातील वादळी पावसात नुकसान झालेल्या मुक्ताईनगर, रावेर, यावल भागांतील विमाधारक केळी उत्पादकांनी संबंधित कंपनीकडे तक्रारी नोंदविल्या, परंतु कंपनीने अजूनही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
जून महिन्यात मुक्ताईनगर, रावेर भागांत वादळात सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले. विमाधारक शेतकऱ्यांनी यासंदर्भात नियुक्त केलेल्या एचडीएफसी एर्गो कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. नुकसानीनंतर ४८ तासांत या क्रमांकावर किंवा कंपनीचा फॅक्स क्रमांक, इ मेलवर तक्रार नोंदविणे बंधनकारक होते. विमा कंपनीकडून संबंधित शेतकऱ्यांची माहिती घेण्यात आली. त्यात नाव, गट नंबर, गाव, बिगर कर्जदार की कर्जदार विमाधारक आहेत आदी मुद्दे घेण्यात आले. त्यानंतर एक यादी घेऊन संबंधित कंपनीचे कर्मचारी आले. त्यांनी माहिती घेतली. परंतु नुकसान क्षेत्राचे पंचनामेच केलेले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
नुकसानीबाबत जिल्ह्यातील खासदार व इतर लोकप्रतिनिधींनी केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेऊन भरपाईची मागणी केली. परंतु, यानंतरही शेतकऱ्यांना नियमानुसार भरपाई देण्यासंबंधीची कार्यवाही विमा कंपनीकडून पूर्ण झालेली नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.