सातारा ः जलयुक्त शिवार योजना, मनरेगासह अन्य योजनांतून केलेली जलसंधारणाची कामे तसेच परतीचा दमदार झालेला पाऊस, यामुळे यंदा सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील भूजलपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत पाणीटंचाईची झळ कमी बसत असून, टॅंकरच्या संख्येतही घट झाली आहे.
मागील पाच वर्षांच्या मार्चमधील सरासरी भूजलपातळीचा विचार करता सर्वच तालुक्यांतील पाणीपातळी वाढली आहे. विशेषतः दुष्काळी माण व खटाव तालुक्यात यंदा भूजलपातळीत एक मीटरपेक्षा जास्त वाढ झाली आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारण कामांचे फलित आता दिसू लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईची धग कमीच झाली आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील ५० पाणलोट क्षेत्रात १०६ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या आहेत. या विहिरींमधील पाणीपातळीची मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाहणी करण्यात आली. त्यानुसार सर्वच तालुक्यात भूजलपातळीत वाढ झाली आहे. १०६ पैकी ८४ विहिरींतील पाणीपातळी वाढ झाल्याचे आढळले आहे. दुष्काळी तालुक्यासह इतर तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याने पातळीत वाढ झाली.
भूजलपातळीत तालुकानिहाय झालेली वाढ (मीटर) ः खंडाळा १.३९, खटाव १.६३, कोरेगाव १.२१, माण १.३३, वाई १.१२, महाबळेश्वर ०.३३, पाटण ०.१४, फलटण ०.४०, सातारा ०.२१, जावळी ०.६४, कऱ्हाड ०.३४.