सोलापूर ः ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांचे अर्थचक्र कारखानदारीवर अवलंबून आहे. त्यामुळे राज्यातील कुठलाही साखर कारखाना बंद राहता कामा नये, ही राज्य शासनाची भूमिका आहे’’, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी पाटील बोलत होते. या वेळी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, कार्यकारी संचालक झुंजार आसबे, ह. भ. प. जयवंत महाराज बोधले, उपप्रादेशिक सहसंचालक पांडुरंग साठे, उपनिबंधक तांदळे यांच्यासह कारखान्याचे संचालक तसेच शेतकरी सभासद उपस्थित होते.
पाटील म्हणाले,‘‘राज्यातील जे साखर कारखाने बँकांच्या ताब्यात आहेत आणि अनेक वर्षे बंद आहेत. त्या भागातील ऊस गाळपास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. ग्रामीण उद्योगास चालना मिळण्यासाठी असे कारखाने सुरू करणे आवश्यक आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी असे सहकारी साखर कारखाने दीर्घ मुदतीने भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख आहे. उजनी धरणाच्या निर्मितीमुळे या जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता शेतकरीही शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यामुळे उसाच्या हेक्टरी उत्पादनातही वाढ झाली आहे. त्यादृष्टीने कारखान्यांनीही बदल करणे आवश्यक आहे.’’
‘उपपदार्थनिर्मितीवर भर द्या’
‘‘राज्यात गेल्यावर्षी १०१३ लाख टन गळीत झाले. या वर्षी त्यामध्ये आणखी वाढ होऊन ते ८० ते ८२ लाख टनाने वाढणार आहे. कारखानदारीमध्ये स्पर्धा वाढली आहे. साखर कारखान्यांनी साखरेची उत्पादकता वाढविण्याबरोबरच उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे’’, असेही पाटील म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.