हतनूर धरणात येणारा प्रवाह आटला
जळगाव : जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाचे मागील महिन्याच्या मध्यात उघडे असलेले १० दरवाजे बंद करून दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडे केले आहेत. त्यातून २२८६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाऊस नसल्याने हतनूरमध्ये मध्य प्रदेशातून येणारा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे टप्प्याटप्प्याने बंद केले आहेत. गिरणा, वाघूर या धरणांमध्ये कुठलाही पाण्याचा प्रवाह सध्या येत नसल्याची माहिती आहे. हतनूर धरणात २०.७१ टक्के, तर वाघूरमध्ये ३४.४९ टक्के जलसाठा आहे. गिरणा धरणातील साठा काहीसा वाढून २७.२० टक्के झाला आहे.
सातपुडा पर्वतानजीकच्या रावेर तालुक्यातील अभोरा प्रकल्पात ४२.८७, मंगरूळ प्रकल्पात ४४.९८, सुकीमध्ये ५५.२७ व मोर प्रकल्पात २४.५२ टक्के जलसाठा आहे. सुकी नदीला जूनमध्ये पूर आला होता. त्या वेळेस या धरणात पाण्याचा प्रवाह आला. नंतर मात्र जोरदार पाऊस नसल्याने या धरणातील जलसाठा वाढला नाही. पारोळा तालुक्यातील अग्नावती व भोकरबारी प्रकल्पांतील साठा शून्यच आहे. चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पासह पाचोरा तालुक्यातील बहुळा प्रकल्पामध्ये मृतसाठा शिल्लक आहे. इतर लघुप्रकल्प, तलाव यांच्यातही फारसा साठा झालेला नाही. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांद्वारे झालेला जलसाठाही आटत आहे.