महात्मा फुले यांच्या साहित्याचा प्रथमच संमेलनात समावेश
महात्मा फुले यांच्या साहित्याचा प्रथमच संमेलनात समावेश 
मुख्य बातम्या

महात्मा फुले यांच्या साहित्याचा प्रथमच संमेलनात समावेश

Suryakant Netke

नगर ः यंदा उस्मानाबाद येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महात्मा जोतिबा फुले यांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर १४२ वर्षांत यंदा प्रथमच महात्मा फुले यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकावर आधारित ‘शेतकऱ्यांच्या दुर्दैवाला जबाबदार कोण?’ या विषयावर चर्चासत्र साहित्य संमेलनात होत आहे.  उस्मानाबाद येथे यंदाचे ९३ वे आखिल भारतीय साहित्य संमेलन शुक्रवार (ता. १०) ते रविवार (ता. १२) या तीन दिवसांच्या कालावधीत ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यात यंदा प्रथमच महात्मा जोतिबा फुले यांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. रविवारी (ता. १२) दुपारी दोन वाजता प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकावर आधारित शेतकऱ्यांच्या दुर्दैवाला जबाबदार कोण? या विषयावर चर्चासत्र होत आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, प्रसिद्ध लेखक डॉ. कैलास दौंड, डॉ. रवींद्र शोभणे, प्रा. साहेब खंदारे व गुरय्या स्वामी यांचा त्यात सहभाग असेल. राज्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्यावर काय उपाययोजना व्हाव्यात यासह शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षण, रोजगार, नोकरी या विषयांवर चर्चासत्रात विचारमंथन होईल. फुलेंनीही नाकारला होता सहभाग  ११ मे १८७८ ला न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले ग्रथंकार साहित्य संमेलन पुण्यातील हिराबागेत झाले. दुसरे संमेलन १८८५ ला झाले. महात्मा जोतिबा फुले यांना या ग्रंथकार साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले. मात्र ‘संमेलनात शेतीशी संबंध नसणारे लोक आहेत. त्यामुळे माझे साहित्य आणि शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जाणार नाहीत याची मला खात्री आहे. त्यामुळे मी सहभागी होणार नाही,’ असे सांगून फुले यांनी सहभाग नाकारला होता.  अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच महात्मा जोतिबा फुले यांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांची सध्याची अवस्था पाहता हे चर्चासत्र महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांसाठी भरीव काम करणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांच्या साहित्यावर प्रत्येक संमेलनात चर्चा व्हायला पाहिजे. - डॉ. कैलास दौंड, चर्चासत्रातील सहभागी साहित्यिक.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT