पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. खरीप हंगामाकरिता कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे सुमारे एक लाख ७९ हजार ७१८ टन खतांची मागणी नोंदविली आहे. त्यापैकी एक लाख ६८ हजार ७३० टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. तसेच गेल्या वर्षीची ३३ हजार ६९ टन खते शिल्लक असून खरिपासाठी एकूण दोन लाख एक हजार ७९९ टन खते उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
यंदा जिल्ह्यात सुमारे दोन लाख ३० हजार ८२६ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यामध्ये भात व सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून होणारी खतांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे कृषी विभागानेही खतांबाबत अडचणी निर्माण होऊ नये म्हणून नियोजन केले आहे. लवकरच शेतकऱ्यांना या खताचा पुरवठा होणार आहे.
सुमारे एक लाख १ हजार ३७० टन युरिया, अमोनियम, एमओपी आणि एसएसपी ही खते उपलब्ध होणार आहे. ६७ हजार ३६० टन संयुक्त खते उपलब्ध होणार आहे. आंबेगाव तालुक्यासाठी १९ हजार ४०४ टन खते उपलब्ध होणार आहे. बारामतीसाठी १६,८७३, भोरकरिता ५०६२, दौंडसाठी १६,०२९, हवेलीसाठी १५,१८६, इंदापूरकरिता १६,८७३, जुन्नरसाठी २०,२४८, खेडसाठी १९,४०४, मावळसाठी ४२१८, मुळशीसाठी ४२१८, पुरंदरसाठी ९२८०, शिरूरसाठी २०,२४८, वेल्ह्यासाठी १६८७ टन खते उपलब्ध होणार आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात एक लाख ६६ हजार ४३१ टन खतांचा पुरवठा झाला होता. त्यापैकी ३३ हजार ६९ टन खते शिल्लक आहेत. यामध्ये १३ हजार ७३१ मेट्रीक टन सरळ खतांचा तर १९ हजार ३३८ टन संयुक्त खतांचा समावेश आहे.