भिजपावसाने आंतरमशागतीची कामे रखडली
जळगाव : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून भिजपाऊस सुरू अाहे. सर्वाधिक पाऊस जळगाव जिल्ह्याच्या पश्चिम भागात झाला आहे. त्याचा लाभ पिकांच्या वाढीसाठी होत आहे. वाफसा नसल्याने तण नियंत्रण, आंतरमशागतीची कामे रखडली आहेत. पावसाच्या उघडिपीनंतर वाफसा होण्यासाठी शेतकऱ्यांना दोन-तीन दिवस वाट पाहावी लागण्याची स्थिती आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सोमवारी (ता.२३) सकाळी ८ पर्यंत चाळीसगाव तालुक्यात १८ मिलिमीटर, पाचोरा येथे १२, पारोळ्यात १८, अमळनेरात ११, चोपडा येथे १४, एरंडोलात ११, धरणगावात १८ मिलिमीटर पाऊस झाला. मध्य भागातील जळगाव तालुक्यात १६ मिलिमीटर, भुसावळात १२, जामनेरात १४ मिलिमीटर पाऊस झाला, तर पूर्व भागातील मुक्ताईनगरात ११ मिलिमीटर, रावेरात १०, यावलमध्ये १०, बोदवडमध्ये १० मिलिमीटर पाऊस झाला.
जुलै महिन्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला असून, ढगाळ वातावरण कायम आहे. फवारणीसाठीची अनुकूल स्थिती नाही. तरी काही शेतकरी स्टीकर वापरून तणनाशकांचा वापर करीत आहेत. कापूस, तूर, कडधान्य, तृणधान्य पिकांची वाढ बऱ्यापैकी आहे. त्यांची आंतरमशागत करण्याची वेळ आली आहे, परंतु वाफसा नसल्याने अडचण आहे. तापी, गिरणा काठालगतच्या काळ्या कसदार जमिनींमध्ये वाफसा होण्यास अधिक वेळ आहे. रविवारी (ता.२२) दिवसभर पावसाची रिपरीम सुरू होती. शेती कामे करताच आली नाहीत. शेतकऱ्यांनी रस्ते चिखलमय असल्याने बैलगाडी घेऊन शेतात जाणे टाळले. सोमवारी सकाळीही जिल्ह्यात हलका पाऊस सुरू होता.
धरणांमध्ये साठा वाढतोय गिरणा नदीवरील गिरणा धरणाचा साठा जवळपास १९ टक्क्यांपर्यंत झाला आहे, तर वाघूरमधील साठाही ३८ टक्के झाला आहे. हतनूरचे १० दरवाजे उघडे आहेत. परंतु पश्चिम भागातील भोकरबारी, अग्नावती, मन्याड, बहुळा, अंजनी या मध्यम प्रकल्पांमधील साठा शून्य टक्केच आहे.