नगर ः कृषी विभागाच्या विविध योजना लोकांपर्यत नेऊन त्याबाबत जनजागृती करण्यासह त्या यशस्वी करण्यासाठी आतापर्यंत ४८१ शेतकरी मित्रांची ‘आत्मा’ने निवड केली आहे. या निवडी ग्रामसभातून झाल्या असून आलेल्या ठरावानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने मंजुरी दिली आहे. अजून ३१० गावांच्या ग्रामसभांचे ठराव प्राप्त झाले नाहीत.
कृषी विभागामार्फत अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. विशेषतः शेती विकासासह नवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, यावर शासनाचा भर आहे. कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अन्य माध्यमातून योजनांबाबत जागृती व्हावी आणि सरकारकडून आलेल्या निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणेमार्फत (आत्मा) शेतकरी मित्रांची नियुक्ती केली जाते.
दोन गावांत एक शेतकरी मित्र निवडला जात आहे. मध्यंतरीच्या काळात शेतकरी मित्रांच्या निवडी रखडल्या होत्या. जिल्ह्यामध्ये १५८१ गावे असून ७९१ शेतकरी मित्रांच्या निवडी करायच्या आहेत. त्यातील आतापर्यंत ग्रामपंचायतीचे ठराव प्राप्त झालेल्या ४८१ शेतकरी मित्रांच्या निवडी केल्या आहेत.
२५ ते ४० वयोगट, किमान दहावीपर्यंतचे शिक्षण, कृषी पदवीधारक असल्यास प्राधान्य, स्वतःच्या शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, गाव पातळीवर नियोजन व विस्तार कार्याची अंमलबजावणी करणारा, गोपालन, शेळीपालनाची माहितीसोबत तंटामुक्ती, बोअरबंदी यांसारख्या उपक्रमातही त्याचा सहभाग, राष्ट्रीय फलोत्पादन, रेशीमशेती, मत्स्यविभाग, पशसंवर्धन आदीच्या योजनांची जाणीव असलेल्या शेतकऱ्यांची निवड करण्याला प्राधान्य दिले आहे.
दोन वर्षांसाठी या निवडी असून कृषी विभाग आणि शेतकरी यांचा समन्वयक म्हणून शेतकरी मित्र काम करणार आहेत. निवड केलेल्या शेतकरी मित्राला प्रवासासह अन्य कामाला प्रतिवर्षासाठी सहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. जिल्ह्यामधील शेतकरी मित्रांच्या मानधनावर दोन वर्षांत जवळपास ९५ लाख रुपये खर्च होतील.