सांगली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याची २८ हजार ७३१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभरा काढणी सुरू झाली असून, खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावाने हरभऱ्याची विक्री करता येत नाही. हरभऱ्याला शासनाने ४४०० रुपये क्विंटल असा दर जाहीर केला आहे. मात्र, खरेदी केंद्र सुरू नसल्याने खासगी व्यापाऱ्यांनी कमी दरात हरभऱ्याची खरेदी सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी हरभरा उत्पादक शेतकरी करू लागले आहेत.
यंदा पाण्याची उपलब्धता आणि चांगला झालेला परतीचा पाऊस यामुळे हरभऱ्याच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र २७ हजार ८३६ हेक्टर असून, चालू हंगामात २८ हजार ७३१ हेक्टर म्हणजे १०४ टक्के पेरणी झाली आहे. यंदाच्या हंगामात हरभरा पिकावर कोणताही कीड-रोगांचा प्रादुर्भाव न झाल्याने पीक चांगले आहे. या वर्षी हरभऱ्याचे उत्पादनातही काहीशी वाढ झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
हरभरा काढणीपूर्वी दर चांगले होते, जसा हरभरा मार्केटमध्ये येऊ लागला, तशी व्यापाऱ्यांनी कमी दरात खरेदी सुरू केली. शेतकऱ्यांना याचा फटका बसू लागला आहे. शासनाने हरभऱ्यास ४४०० रुपये असा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी २६०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे हरभऱ्याची खरेदी सुरू केली आहे. दुसरीकडे हमीभावाने हरभरा खरेदीसाठी शासनाने कोठेही केंद्र सुरू केलेले नाही.
या वर्षी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. मात्र, खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याची लूट सुरू केली आहे. मशागत, खत, मळणी, मजुरीचा खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यात मार्चअखेर असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरजही आहे.