सांगली ः जिल्ह्यात मूग, उडीद या धान्यांची काढणी पूर्ण झाली आहेत. याची विक्री करण्यासाठी शेतकरी बाजार समितीचा आधार घेऊ लागले आहेत. मात्र, प्रत्येक तालुक्यातील बाजार समितीत अद्यापही मूग, उडीद खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. यामुळे खुल्या बाजारपेठेत आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विक्री करावी लागते आहे.
परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यातील बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.
शेतकऱ्यांच्या मूग, उडीद धान्याच्या राशी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे खुल्या खासगी बाजारपेठांत हे धान्य कमी दराने विकावे लागत आहे. खासगी व्यापारी हमीभावापेक्षाही कमी दराने खरेदी करत आहेत. यामुळे दिवाळी तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.
सध्या बाजारपेठेत ४ हजार ५०० रुपये मूग, तर ३ हजार ५०० रुपये दराने उडीद खरेदी सुरू आहे. शासनाकडून केवळ मुगासाठी ५ हजार ९२५ रुपये, तर उडीदसाठी ५ हजार ८०० हमीभाव जाहीर केलेले आहेत.
सांगली बाजार समितीमध्ये उडीद, मूग खरेदी केंद्र सुरू केले जाते. त्यामुळे सांगली बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना उडीद व मूग विक्रीसाठी नेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. सांगली बाजार समितीत मूग, आणि उडदाचे नमुने घेऊन यावे लागत आहे, त्यानंतर विक्रीसाठी यावे लागते. तसेच विक्रीनंतर पुन्हा धनादेश घेण्यासाठी यावे लागते, सातत्याने हेलपाटे मारावे लागतात. त्यात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
‘हमीभाव मिळाला तर अधिक पैसे हाती येतील'
सांगली जिल्ह्यात ज्या ठिकाणी बाजार समितीचे आवार आहेत; तिथे खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. तालुक्याच्या ठिकाणी खरेदीची कोणतीही यंत्रणा नसल्याने शेतकऱ्यांना कमी दरात धान्याची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कमी पावसाने उडीद आणि मुगाचे उत्पादन घटले आहे. यामुळे हमीभाव मिळाला तर अधिक पैसे हाती येतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
मात्र, विक्रीसाठी खरेदीच केंद्र नसल्याने करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांत उपस्थित होऊ लागला आहे. त्यातच बाजारात शेतमाल आणल्यानंतर व्यापारी शेतकऱ्यांना कोंडीत पकडत आहेत, यामुळे दाद कुणाकडे मागायची, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.