जळगाव ः कृषिपंपांच्या थकीत वीज बिलातील किमान तीन हजार रुपये भरा व वीजतोडणी टाळा, अशी सूचना वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावोगावी, खेडोपाडी पोचविली आहे; परंतु शेतकरी मात्र वीजबिल न भरण्यावर ठाम असून, या विरोधात आंदोलनाचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
यातच चोपडा (जि. जळगाव) येथील सुकाणू समितीचे एस. बी. पाटील हे थकीत वीजबिलांच्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक वीज दर कृषिपंपांसंबंधी आकारले जातात. भारनियमनाचा काळ वीजबिल आकारताना गृहीत धरला जात नाही.
सरसकट २४ तास वीज वापराचे बिल दिले जाते. हव्या त्या दाबाने वीज मिळत नाही, असे असताना थकबाकी कशी दाखविता. थेट वीजतोडणी मोहीम कशी राबविता, असे प्रश्न एस. बी. पाटील यांनी उपस्थित केले आहेत. हेच मुद्दे याचिकेत समाविष्ट करून न्यायालयाकडे दाद मागितली जाईल, असे पाटील यांनी म्हटले आहे.
वीज नियामक मंडळाच्या निर्देशानुसार कृषिपंपांना वीज मिळत नाही. दुसऱ्या बाजूला आता सत्तेत असलेल्या मंडळींनी खोटी आश्वासने दिली. वीजबिल माफीच्या घोषणा केल्या. त्या आता अमलात न आणता बिले भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. ते कुठून पैसे भरतील.
- कडूअप्पा पाटील, माजी अध्यक्ष, शेतकरी संघटना (उत्तर महाराष्ट्र विभाग)