सांगली ः सिंचन योजनांतून दुष्काळी भागातील तलाव भरून द्यावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गुरुवारी (ता. १४) शेतकरी संघटनेने उपोषण केले.
सांगली ः जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. सध्या ताकारी, आरफळ, टेंभू, म्हैसाळ योजना सुरू आहे. मात्र, या तिन्हीही योजनांतून दुष्काळी भागातील तलाव भरून द्यावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गुरुवारी (ता. १४) शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
दुष्काळी भागातील तलाव आठ दिवसांत भरून न दिल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकरी संघटनेचे महादेव कोरे, माणिक माळी, इसाकभाई सौदागर, शिवाजीराव पाटील आदींनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकरऱ्यांचे सरसकट कर्ज माफ व्हावे, येरळा नदीत पाणी सोडावे, दुबार पेरणीसाठी जाहीर केलेले दहा हजार रुपये विनाविलंब मिळावेत आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत.
दुष्काळी भागात पाण्याची मोठी टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ सिंचन योजना सुरू केल्या आहेत. मात्र, या सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागातील तलाव अद्यापही भरून दिले नाहीत. यामुळे द्राक्ष पिकासह डाळिंब पिकाला पाण्याची कमतरता भासू लागली आहे. यामुळे शासनाने दुष्काळी भागातील तलाव लवकरात लवकर भरून द्यावेत, अशी मागणी केली आहे.