संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरात एल्गार
संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरात एल्गार 
मुख्य बातम्या

संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरात एल्गार

टीम अॅग्रोवन

पुणे ः शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन मोदी सरकारने पूर्ण करावे, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, प्रत्यक्ष उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिला गेला पाहिजे, यासह शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविल्या पाहिजेत, आदी मागण्यांसाठी राज्यात २१ जिल्ह्यांत ठिकठिकाणी बुधवारी (ता. ८) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात राज्यातील शेतकरी संघटनांसह देशभरातील २०८ शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या. किसान सभेसह अन्य शेतकरी संघटनांतर्फे अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. 

कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांतर्फे कोल्हापूर- सांगली महामार्गावर सकाळी काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्याने काही काळ महामार्ग बंद राहिला. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली-इस्लामपूर मार्गावर ठिय्या मारत रस्ता रोखून धरला होता. तसेच हळदी (ता. करवीर) येथे शेकापच्या वतीने माजी आमदार संपत बापू पाटील यांच्या नेतत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बुलडाणा-खामगाव रस्त्यावरील वरवंड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.नगर जिल्ह्यामधील राहुरी, अकोले, पाथर्डी यासह अन्य भागात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. अकोल्यात अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डाॅ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सोलापूर जिल्ह्यात तुंगत, लऊळ, रिधोरे आदी ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. तसेच निवेदन नायब तहसीलदार तिटकारे आणि पोलिस निरीक्षक किरण अवचर यांना निवेदन  देण्यात आले. 

जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वर बुधवारी (ता. ८) रास्ता रोको करण्यात आले. तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्‍यातील गोळेगाव येथेही शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. यावेळी तब्बल दीड तास औरंगाबाद-जळगाव मार्ग अडविण्यात आला. तसेच परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील अनेक भागात ग्रामीण भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून पाहिले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. याला सर्वस्वी सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. आम्ही केंद्र व राज्य या दोन्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहोत. केंद्र सरकारने आयात निर्यात धोरणात लवचिकपणा आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या धोरणामुळेच शेतकरी संकटाच्या खाईत जात आहे आणि सरकारने आपले धोरण न बदलल्यास सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत. केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांचा खेळ चालवला आहे. नुकत्याच सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीकडून अपेक्षाभंग झाला आहे. अत्यंत कुचकामी कर्जमाफीची योजना शासनाने जाहीर केली. आणि पोस्टद्वारे याची जाहिरात करण्यात येत आहे, हे संतापजनक आहे. आजचे आंदोलन म्हणजे केवळ एक ट्रेलर आहे. निर्णय न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. - राजू शेट्टी, माजी खासदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT