बुध, जि. सातारा : गेल्या काही दिवसांपासून कोबी व टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोबी, टोमॅटो व फ्लॉवरला किलोस दोन ते तीन रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे. भाजीपाला काढणीचा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीक काढणी थांबविली आहे. तर, काही हतबल शेतकऱ्यांनी शेतात मेंढरे चरावयास सोडली आहेत.
उत्तर खटाव परिसरातील डिस्कळ, पसूचामळा, शिंदेवाडी, बुध, काटेवाडी, करंजओढा, ललगुण, नागनाथवाडी आदी गावांतील शेतकरी विहिरीच्या पाण्यावर वर्षभर वांगी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर आदी भाज्यांची लागवड करतात. सध्या सर्वत्र भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे भाज्यांना कवडीमोल दर मिळत आहे.
टोमॅटोची निदान दोन-तीन रुपये दराने विक्रीतरी होत आहे. परंतु, कोबीची अवस्था याहून बिकट आहे. बाजारात मागणी नसल्याने कोबी आणू नका, अशी सूचनाच व्यापाऱ्यांकडून होत आहे. कोबीत जनावरे सोडण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरला नाही.
उत्पादन खर्च तर दूरच तोडणीचा खर्चही निघत नसल्याने डिस्कळ, बुध, काटेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी काळजावर दगड ठेवून कोबीच्या उभ्या पिकात मेंढरे चरावयास सोडली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.