भंडारा ः जिल्ह्यात नुकतीच वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. यावेळी जैतपूर (बारव्हा) येथील मेंढपाळांच्या तबेल्यावर वीज पडून १५ शेळ्यांचा मृत्यू झाला होता. या मेंढपाळांना दोन लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीने केली आहे.
भंडारा तहसीलदार संतोष महाले यांना या विषयीचे निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धनगर समाज विखुरलेला आहे. त्यांचा परंपरागत शेळी-मेंढीपालनाचा व्यवसाय ते करतात. शेतात शेळ्या-मेंढ्या बसवून मिळेल त्या मोबदल्यात पोटाची खळगी भरतात. खरिपापूर्वी हा समाज भटकंतीवर निघतो. लाखांदूर तालुक्यातील किन्ही येथे विश्वनाथ भेंडारकर यांच्या शेतात त्यांचे बस्तान होते.
रात्रीला अचानक चक्रीवादळ, अवकाळी पाऊस झाला. याच दरम्यान वीज कोसळून १५ शेळ्यांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे आधीच अडचणीत आलेल्या मेंढपाळांवर यामुळे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त निलेश गोमासे, पुरुषोत्तम कोरे, गोवर्धन नागोसे, चोपराम पंधरे, प्रमोद पडारे यांना १५ शेळ्यांची भरपाई म्हणून २ लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी आहे.
धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे, अनिल घोरपडे, प्रकाश हातेल, मारोती गोमासे, गिरधर पडारे, सोनू हातेल, अशोक टापरे, अनिकेत घोरपडे, दिनेश घोरपडे, दिनेश वावरे ज्योती टापरे, प्रतिभा गोमासे, वनिता टापरे, माधवी टापरे यांनी हे निवेदन दिले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.