पुणे ः पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यामुळे पाण्यास मागणी वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांत ९४.९३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी केले आहे.
पावसाळ्यात जिल्ह्यातील पश्चिम पटट्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २४ धरणे तुडुंब भरली होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून धरणातील पाण्याचा वापर सुरू आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन प्रमुख शहरांना खडकवासला, पवना धरणांतून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच शेतीसाठीही पाणी धरणातून सोडले जात आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. मात्र, धरणातील घटत असलेली पाणीपातळी बघता पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याची आवश्यकता आहे.
सध्या पिंपळगाव जोगे, येडगाव, डिंभे, घोड, कळमोडी या धरणांच्या डाव्या कालव्यातून विसर्ग सुरू आहे. तसेच डिंभे, घोड, आंद्रा, पवना, खडकवासला, गुंजवणी धरणांतून उजव्या कालव्याद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने घटू लागली आहे. सध्या धरणांत मुबलक पाणीसाठा आहे; परंतु वेळेवर पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, असेही जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
धरणनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये) : पिंपळगाव जोगे १.७९, माणिकडोह ५.४३, येडगाव १.८६, वडज ०.६७, डिंभे, ७.४८, घोड ३.०३, विसापूर ०.६७, कळमोडी १.४६, चासकमान ३.९७, भामा आसखेड ५.७७, वडीवळे ३.६६, आंद्रा २.५३, पवना ४.८५, कासारसाई ०.३८, मुळशी ८.३५, वरसगाव ७.२५, पानशेत ७.१०, खडकवासला १.५५, गुंजवणी १.४६, नीरा देवधर ६.१९, भाटघर १६.३८, वीर ५.८८, नाझरे ०.२२.