आंबेगाव तालुक्यात पावसाने पिकांचे नुकसान
आंबेगाव तालुक्यात पावसाने पिकांचे नुकसान 
मुख्य बातम्या

`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा

sandeep navale

पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना यंदा खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजन हुकले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी लागेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पीक पेरण्या व भात लागवडी केल्या. पिके चांगली आली होती. यातून चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती; पण अतिपावसामुळे पिके होत्याची नव्हती झाली. दुष्काळातून सावरत असताना पुन्हा आमच्या स्वप्नावर अस्मानी संकट कोसळल्याच्या भावना आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

पंधरा ते वीस दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली उत्तरेकडील खेड, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे भातखाचरामत अतिपाणी साठल्याने अनेक ठिकाणी बांध फुटले. यामुळे भात, बटाटा, बाजरी, मूग, वाटाणा, उडीद, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली.  

उन्हाळ्यात पाणीटंचाईने हैराण झालो होतो. खरिपात उशिराने पाऊस सुरू झाला. माझ्याकडे एकूण साडेचार एकर शेती आहे. जूनमध्ये थोडाफार पाऊस झाल्याने भातरोपे टाकली. मात्र, लागवडीच्या वेळेस अतिपाऊस झाला. यामुळे बांध फुटल्याने भात रोपे गाडली गेली. परिणामी एक एकर क्षेत्र लागवडीविना राहिले. दोन ते तीन एकरांवर लागवड केली. मात्र, पुन्हा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने पुन्हा बांध फुटले. शेतात लागवड केलेली रोपे पुन्हा पाण्याखाली जाऊन सडून गेले. या नुकसानीतून सावरण्याची ताकद नाही. सरकारने आता तरी आधार द्यावा अशी अपेक्षा पोखरी (ता. आंबेगाव) येथील आदिवासी शेतकरी बाळू कोळप यांनी केली. 

बाळू भंडारी हा युवक शेतकरी गेल्या तीन ते चार वर्षांपासून अतिपावसाच्या संकटाशी झुंजत आहे. गेल्या वर्षीही असाचा मोठा पाऊस झाला होता. त्या वेळीही मोठे नुकसान झाले होते. रब्बीत आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई होती. आता चांगला पाऊस होईल म्हणून शेतीचे योग्य नियोजन केले होते. एकाच दिवशी मोठा पाऊस झाल्याने शेतातील बांध फूटून वाहत होते. यामुळे एक एकरांवरील भात पिकाचे पूर्ण नुकसान झाले. शासनाने यावर काही तरी करावं अशी अपेक्षा श्री. भंढारी यांनी व्यक्त केली.  

कुदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी राजेंद्र तेली यांना सुद्धा एका दिवसात झालेल्या पावसाचा मोठा फटका बसला. नुकसान झालेल्या बटाट्याचे करायचे या विचारात श्री. तेली आहेत. पिकांचे किमान पंचनामे झाले तरी झालेला खर्च तरी मिळेल, अशी अपेक्षा होती; पण नुकसान होऊन दहा ते पंधरा दिवस उलटले तरी पंचनाम्यासाठी शासनाचा एकही अधिकारी आला नाही, असे त्यांनी सांगितले.

चालू वर्षी एकूण पाच एकरांपैकी तीन एकरांवर बटाट्याचे पीक घेतले. आत्तापर्यंत जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च झाला. यासाठी एक लाख १२ हजार रुपयांचे कर्ज घेतले. आता ते कसे फेडायचे हा प्रश्न आहे. पुन्हा ज्वारीची पेरणी करायची झाली तर परत खर्च करावा लागणार आहे. आता पैसे नाही, त्यामुळे पुन्हा ६०-७० हजार रुपयांचे कर्ज काढावं लागणार आहे. तरच पुढच्या पिकाचं नियोजन करता येईल. सरकाराने किमान लवकर पंचनामे केले तर हे पीक मोडून ज्वारी तरी पेरता येईल. त्यामुळे पंचनामे करून लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.     

महिला शेतकरी आशा निवृत्ती कुदळे म्हणाल्या, की आमच्याकडे पाच ते सहा एकर शेती आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सर्व क्षेत्रावर बटाट्याची लागवड केली होती. पण एका दिवसाच्या पावसानं सगळंच गेलं. बटाटा पिकाला दीड ते दोन लाख रुपये खर्च केला होता. सगळा खर्च पाण्यात गेला. आता कर्ज फेडायचे पण ऐपत नाय. पंचनाम्यासाठी पिक ठेवलं होतं. पण ते झाले नाहीत. नुकतेच अधिकारी येऊन गेले. परत कोणीच आलं नाही. त्यामुळे पीक नांगरून टाकलं. आता ज्वारी करू म्हटलं तर बियाणे नाय. त्यासाठी पैसे नाय. सरकारने काहीतरी मदत केली तरच पुढचं पीक घेता येईल.

पारगावतर्फे खेड येथील बाजीराव चिखले म्हणाले, की आमच्याकडे गेल्या दहा ते पंधरा दिवस नुसतीच पावसाची भूरभूर होती. पण एका दिवशी मुसळधार पाऊस झाला, अन बांध फुटून पाणी वाहू लागलं. बटाट्याचं मोठं नुकसान झालं. माझ्याकडं चार एकर शेती आहे. यंदा सर्व क्षेत्रावर बटाटा केला होता. पावणेदोन लाख रुपये खर्च झाला होता.  त्यासाठी तीन लाख रुपयांचे कर्ज घेतल होतं. पण आता सगळं धुळीला मिळालं. घर पण पडलं. आता बहिणीच्या घरात राहतोय. नुकसानीचे अजून पंचनामे झालेले नाहीत. त्यासाठी एकही अधिकारी आला नाही. हे सरकार नुसतं देऊ, बघू म्हणतं, पण काहीच मदत देत नाही.  

पंचनाम्यावरून वाद   कुंदळेवाडी व परिसरातील गावातील नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा व तालुका पातळीवरून देण्यात आल्या आहेत. हे पंचनामे ग्रामसेवक, कृषी सहायक आणि तलाठी यांनी एकत्रित येऊन करायचे आहे. मात्र, कोणी कोणत्या गावात नुकसानीचे पंचनामे करायचे असे न सांगितल्याने ग्रामसेवक व कृषी सहायकांमध्येच पंचनाम्यावरून वाद सुरू झाला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT