पावसाअभावी बाजरीचे पिक सुकून चालले आहे
पावसाअभावी बाजरीचे पिक सुकून चालले आहे 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

टीम अॅग्रोवन

पुणे  ः पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे खरीप पेरणीच्या क्षेत्रात चांगलीच घट झाली. उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी केली असली तरी, पावसाने ओढ दिल्याने बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात जवळपास ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घट येणार असून, शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.  

खरीप हंगामात पावसाने चांगलीच ओढ दिल्याने पुरेशा प्रमाणात पेरण्या झालेल्या नाहीत. अजूनही जिल्ह्यातील पूर्व भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात पावसाअभावी एक लाख सात हजार ७३९ हेक्टर क्षेत्र पेरणीपासून दूर राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. पूर्व पट्ट्यातील शिरूर, इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर या तालुक्यांत अनेक ठिकाणी अजूनही ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेली पिके सुकू लागली आहे.

जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र दोन लाख ३० हजार ८२६ हेक्टर आहे. त्यापैकी एक लाख २३ हजार ८७ हेक्टरवर म्हणजेच ५३ टक्के पेरणी झाली. काही तालुक्यांत कमी पाऊस झाल्याने पेरणीचे प्रमाणही कमी आहे. पिकांसाठी पावसाची अत्यंत आवश्यकता आहे.  

पश्चिम भागात उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे भात लागवडीदेखील उशिरा झाल्या आहेत. या भागातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांच्या पश्चिम भागात सुमारे ३८ हजार २३४ हेक्टरवर भाताची पुनर्लागवड झाली आहे. ३४ हजार ७१९ हेक्टर क्षेत्र अजूनही भात लागवडीपासून दूर आहे.

चाऱ्यासाठी अनेक शेतकरी मक्याची पेरणी करतात. यंदा त्याच्या क्षेत्रातही ४० टक्क्यांनी घट झाली असून, जिल्ह्याभरात अवघ्या सहा हजार ६२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेले बाजरी व सोयाबीन ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. मूग पीक काही ठिकाणी फुलोऱ्यांच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी पक्वतेच्या व काढणीच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत असून, या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागांत तुरळक ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे भातपिकांना दिलासा मिळाला असून, हे पीक वाढीच्या अवस्थेत आहेत. वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी झालेल्या अतिपावसामुळे अनेक भागांत भाताचेही मोठे नुकसान झाले. त्याचाही परिणाम उत्पादनावर होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकरी प्रतिक्रिया

यंदा पाच ते सहा एकरांवर बटाट्याची लागवड केली होती. पावसामुळे पीक ऐन जोमात आले होते. पण, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे नुकसान झाले. 

- आशा निवृत्ती कुदळे, शेतकरी, कुदळेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे.

माझ्याकडे एकूण ७० एकर शेती आहे. यामध्ये डाळिंब, द्राक्षे, शेवगा, बोर अशी विविध पिके घेतली आहेत. पाण्याअभावी ही पिके सुकत आहेत. आता सप्टेंबर महिना सुरू झाला तरी दमदार पाऊस झालेला नाही. अशीच स्थिती राहिल्यास फळबागा जळून जाण्याची शक्यता आहे.  - अतुल शिंगाडे, शेळगाव, शेतकरी, ता. इंदापूर, जि. पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT