बुलडाणा : मोताळा तालुक्यात गेल्या काळात झालेल्या संततधार पावसाचा कपाशीच्या पिकाला मोठा दणका बसला आहे. या नुकसानाच्या भरपाईवरून शेतकरी संघटना सातत्याने आंदोलने करीत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कुठलाही आधार मिळालेला नसल्याने तो पुरता खचला आहे.
मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा बाजार हा परिसर कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. यंदा पाऊस व वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. कोऱ्हाळा बाजार गावातील संदीप श्रीकृष्ण दांडगे या शेतकऱ्याने हंगामात सुरुवातीलाच सहा एकरात बीटी कपाशीचे वाण लावले.
योग्य मशागत व व्यवस्थापन केल्याने पीक चांगले वाढले होते. झाडांवर कैऱ्याही मोठ्या संख्येने लागल्या होत्या. असे असतानाच ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसामुळे परिपक्व झालेले बोंडे खराब झाली. सोबतच वादळी वाऱ्यामुळे पीक जमीनदोस्त झाले. या भागात सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस झाला. झाडांवरील पानेही गळली.
सध्या शेतात प्रत्येक झाडावर काळवंडलेली बोंडेच तेवढी दिसत आहेत. कुठल्याही बोंडातून चांगला कापूस निघत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. एकरी १५ ते २० हजारांचा आजवर खर्च लागला. सहा एकरासाठी एक लाखावर खर्च झाला आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.