जळगाव ः मजुरांनी कापशीची पऱ्हाटी उपटल्यानंतर ती एका ठिकाणी शेतातच गोळा केली जाते. लागलीच तिचा भुसा तयार केला जात अाहे. (छायाचित्र ः चंद्रकांत जाधव)
जळगाव ः जिल्ह्यात कपाशीवर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी क्षेत्र रिकामे करीत आहेत. त्यातच या रोगग्रस्त कपाशीची पऱ्हाटी उपटून पेपर मिलचे ठेकेदार शेतातच तिचा कुट्टी मशिनद्वारे भुसा करून नेत आहेत. शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला पऱ्हाटीसंबंधी ठेकेदाराकडून मिळत नाही. फक्त क्षेत्र रिकामे करण्याचा शेतकऱ्यांचा खर्च तेवढा वाचत असल्याचे चित्र आहे.
क्षेत्र रिकामे करून त्यावर हरभरा, मका व इतर पिकांची पेरणी केली आहे, तर सध्या गव्हाची पेरणी सुरू झाली आहे. पऱ्हाटी उपटण्यासाठी कुठलाही खर्च शेतकऱ्याकडून घेतला जात नाही. कुठल्याही खर्चाशिवाय व कमी वेळेत आपले क्षेत्र रिकामे होत असल्याने शेतकरी या ठेकेदारांना पऱ्हाटी देऊ लागले आहे. आजघडीला जवळपास २० ते २१ हजार हेक्टर क्षेत्र रिकामे करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
पूर्वहंगामी कपाशीवर रोगराई अधिक आहे. बोंडे किडत असून, त्यातून कापूस निघत नाही. नुकसान होत असल्याने कपाशीचे क्षेत्र पेपर मिलचालकांच्या मदतीने रिकामे करून घेतले जात आहे. त्यात शेतकऱ्यांचा पऱ्हाटी उपटण्याचा खर्च वाचतो.
- संजय नारायण चौधरी, शेतकरी खेडी खुर्द (जि. जळगाव)