जळगाव : जिल्ह्यात मागील १० दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शनिवारी (ता. १०) तुरळक पाऊस झाला. सकाळपासून काळे ढग आकाशात जमा झाले होते. पाऊस येऊन नुकसान होईल या भीतीने गहू व हरभऱ्याच्या मळणीचे काम शेतकऱ्यांना उरकून घ्यावे लागले.
गव्हाची मळणी अधिक वेगाने करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या यंत्रणांचा वापर करून घ्यावा लागला. त्यासाठी एकरी ५०० रुपये जादा खर्चही आला. पंजाबमधून आलेल्या मोठ्या यंत्रणांचा वापर शेतकरी मळणीसाठी करताना दिसून आले. हरभरा कापणीनंतर शेतात गोळा केलेले ढीग ताडपत्रीने झाकण्याचे कामही शनिवारी सकाळीच अनेक शेतकऱ्यांनी केले.
अधूनमधून पावसाचे थेंब येत होते. आकाशात काळे ढग जमा व्हायला सकाळपासूनच सुरवात झाली. सकाळी ७.३० ते ९ यादरम्यान तुरळक थेंबही आले. यानंतर तुरळक पाऊस बंद झाला. परंतु ढगाळ हवामान कायम होते.
मागील १० दिवसांपासून ढगाळ हवामान कायम असल्याने केळी पिकावर प्रतिकूल परिणाम होत आहे. आगाप लागवडीच्या बागांची हवी तशी वाढ नाही. करपा रोगाचा प्रभाव आणखी वाढू लागला आहे. झाडांची प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया मंदावली असून, परिणामी त्यांना जमिनीतून हवे ते अन्नघटक घेता येत नाहीत. केळी पक्व होण्याची प्रक्रियाही संथ झाली आहे. परंतु पावसामुळे कापणीवरील केळीचे नुकसान होईल म्हणून थोडी अपरिपक्व केळीची काढणीही शेतकरी करून घेत आहेत.
ढगाळ हवामान आणि गारपिटीची भीती यांमुळे शेतांमधील आपले पशुधन, कुटुंब व पूर्ण बिऱ्हाडासह वास्तव्य करणारे मेंढपाळ बांधव, काठेवाडी बांधव यांच्यासमोर अडचणी येत आहेत. आपले साहित्य रोज ताडपत्रीने झाकून ठेवण्याची कसरत त्यांना करावी लागते. पाऊस आला किंवा गारपीट झाली तर त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल, अशी स्थिती आहे.
धुळे जिल्ह्यातही मागील तीन ते चार दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामान आहे. या भागात कांदा काढणी किंवा खांडणीचे काम धुळे तालुक्यातील काही भागांत सुरू झाले आहे. तर दादर, हरभरा मळणीचे काम शिंदखेडा, शिरपुरात जोमात सुरू आहे. परंतु ढगाळ हवामानामुळे शेती कामांवर परिणाम होत असून, नुकसानीची भीती शेतकऱ्यांना आहे.