नाशिक जिल्ह्यात ७७ टक्के खरीप पेरणी
नाशिक : नाशिक जिल्ह्यात गुरुवार (ता. २६) पर्यंत खरिपाच्या सरासरी ७७.४५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाऊस सर्वदूर होत अाहे. मात्र, तो उशिरा आल्यामुळे पेरण्या लांबल्या आहेत. जुलैअखेरपर्यंत सर्व क्षेत्रावर पेरण्या होतील, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील इगतपुरी तालुका वगळता उर्वरित भागात जून महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाचे आगमन झाले नव्हते. जुलै महिन्यातही बहुतांश भागात उशिराच हजेरी लावल्याने खरीप पेरणीचे नियोजन कोलमडले. या स्थितीत शेवटच्या टप्प्यात २७ जुलैपर्यंत सरासरी ७७ टक्के पेरणी झाली आहे. यातही मक्याची सरासरीपेक्षा म्हणजे ११० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्या खालोखाल सोयाबीन ९० टक्के तर कपाशीचा पेरा ९० टक्के क्षेत्रावर झाला आहे. भाताची लागवड ६५ टक्के क्षेत्रावर झाली आहे. मका, सोयाबीन, कापूस आणि भात ही जिल्ह्यातील खरिपाची प्रमुख पिके आहेत.
जिल्ह्यात पाऊस सर्वदूर पोहोचला आहे. मात्र त्याचे प्रमाण सारखे नाही. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर, नांदगाव, सिन्नर, येवला, चांदवड, बागलाण, मालेगाव या तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. या स्थितीत बहुतांश भागात पेरण्या लांबल्या आहेत. नाशिक, कळवण, दिंडोरी, निफाड या तालुक्यात मागील पंधरवड्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. सलग दोन दिवस संततधार झाल्यानंतर पावसाचा जोर ओसरला. या काळात पेरण्या वाढल्या. येत्या पाच सहा दिवसांत सर्व भागात पेरण्या होतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.