नाशिक जिल्ह्यात ५० कोटींची उलाढाल ठप्प
नाशिक : डिझेल दरवाढ, टोल परमिट यांसह विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने सहा दिवसांपासून बंद पुकारला आहे़. या आंदोलनात देशातील एक हजार पाचशे माल वाहतूक संघटनांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील वीस हजारांहून अधिक ट्रकमालक सहभागी झाले आहेत़. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश शर्मा यांनी दिली़.
दरम्यान निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स व अवजड वाहतूक सेनेसह विविध संघटनांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेनेही माल वाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनास पाठिंबा दिला आहे़. डिझेलच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली वाढ, टोल नाक्यावर ट्रक थांबून राहत असल्याने होणारा डिझेलचा अपव्यय टाळण्यासाठी नॅशनल परमिटप्रमाणेच टोल परमिट यांसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून (ता.२०) देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले़. सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील २० हजारांहून अधिक ट्रकमालकांनी सहभाग घेतला अाहे.
सरकारने डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षात आणून त्यावरील अधिभार कमी करावा, देशात सर्व ठिकाणी डिझेलचे दर एकच असावेत़, नॅशनल परमिटसारखेच टोलसाठीही परमिट मिळावे, थर्डपार्टी विम्यामधील वाढ कमी करावी, ट्रान्सपोर्ट व्यवसायातील टीडीएस आकारणी व ई-वे बिलप्रणालीतून दिलासा मिळावा, अशा विविध मागण्या माल वाहतूकदारांच्या आहेत़. या मागण्या पूर्ण होईपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार माल वाहतूकदार संघटनेचे अंजू सिंगल, संजय राठी, सुभाषचंद्र जांगडा, राजेंद्र फड, अमोल शेळके, लक्ष्मण सिरसाठ, सुनील हिरे, सुनील बुरड, जे. पी. जाधव, शरद बोरसे, ज्ञानेश्वर वर्पे, महावीरप्रसाद मित्तल आदींनी केला आहे.