सोलापुरात ‘ओटीएस’चे २८ हजार शेतकरी लाभार्थी
सोलापूर : दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुरू केली. त्यानुसार जिल्ह्यातील २७ हजार ९६५ शेतकऱ्यांनी लाभ घेतला अाहे. त्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून २४२ कोटी २६ लाख रुपये मिळाले आहेत.
पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतून या योजनेला अल्प प्रतिसाद असून मोहोळ, बार्शी, करमाळा, माळशिरस, अक्कलकोट, सांगोला व उत्तर सोलापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेला आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दीड लाखावरील रक्कम संबंधित बॅंकांत भरल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे राज्य सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, जिल्ह्यातील सुमारे २२ हजार ‘ओटीएस’साठी पात्र असलेल्या खातेदारांची यादीच शासनाकडून बॅंकांना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पैसे असूनही कर्जमाफीचा लाभ घेता येत नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची सध्या झाली आहे. कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा शेतीकामांसाठी नव्याने बॅंकांकडून कर्ज काढता येईल, अशी शेतकऱ्यांची आशा आहे. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांच्या याद्या शासन स्तरावरून बॅंकांना मिळत नाहीत. आणखी शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणीच सुरू असल्याचे सांगण्यात येते.
जिल्हा बॅंक | ५,४६७ |
राष्ट्रीयीकृत बॅंका | १९,३२६ |
विदर्भ कोकण बॅंक | ३,१७२ |
एकूण | २७,९६५ |