सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या संचालक मंडळाने पदभार हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या आणि बाजार समितीचा सेस न भरताही मनमानी कारभार करणाऱ्या सुमारे २५ आडत व्यापाऱ्यांचे परवाने थेट रद्द करण्याची कारवाई केली आहे. या नंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले, तरी त्यांना परवाना पुन्हा देता येणार नाही, अशी पणन मंडळ कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.
बाजार समितीच्या नव्या संचालक मंडळाची बैठक सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. बाजार समितीतील विविध विषयांवर त्यात चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडत व्यापारी शेतकऱ्यांचा माल विक्री करतात, परंतु पैसे देत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या होत्या. अनेक व्यापाऱ्यांसंबंधीच्या तक्रारी शेतकऱ्यांनी थेट बाजार समिती प्रशासक व सध्याच्या संचालक मंडळाकडे केल्या होत्या. त्यानुसार नव्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही कारवाई करण्यात आली.
अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले. याबरोबरच ते बाजार समितीचा सेसही भरत नसल्याचे चौकशीत आढळले. त्यानंतर प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. त्यालाही या व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवली होती.
परवाने रद्द केलेले व्यापारी तुकाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रविकांत पाटील, अविनाश पाटील, एम. आय. कल्याणी, संतोष बणजगोळे, सुरेश जाधव-पाटील, जिलाणी कल्याणी, धानप्पा दहिटणे, नसीर अहमद खलिफा, अनिल हेबळे, म. कैफ ट्रेडर्स, अमन कल्याणी, छोटूभाई बागवान, ताजबाबा ट्रेडिंग कंपनी, कल्याणी ट्रेडर्स, कैलास पौळ, पैलवान ट्रेडर्स, बाबा ट्रेडर्स, काका ट्रेडर्स, आसिफ ट्रेडर्स, रुद्रेश पाटील, महेश बिराजदार, इब्राहीम बागवान, एस. एम. ट्रेडर्स.