वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टीने १४ हजार हेक्टरचे नुकसान
वाशीम : जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून दरम्यानच्या काळात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मानोरा, कारंजा या तालुक्यांना जोरदार बसला आहे. जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १४ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणची जमीनही खरडून गेली आहे. संततधार पाऊस कायम असल्याने नुकसानीची आकडेवारी अंतिम होण्यात अडथळे निर्माण झालेले आहेत.
सोळा ते १८ ऑगस्टदरम्यान ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले. पुराचे पाणी शेतांमधून वाहले. सखल भागातील शेतांमध्ये अद्यापही पाणी असल्याने पिकांचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटाचा प्राथमिक आढावा यंत्रणांकडून घेतला जात आहे. यानुसार एकट्या मानोरा तालुक्यात सुमारे नऊ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला पावसाचा, पाण्याचा फटका बसला आहे. कारंजा तालुक्यात पाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
वाशीम जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद ही पिके कुठे फुलोर तर कुठे शेंगा परिपक्व होण्याच्या स्थितीत आहेत. अनेकांचे मुगाचे पीक काढणीला आले आहे. पावसामुळे शेंगामधून कोंब बाहेर येण्याची भीती निर्माण झालेली आहे. गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांकडून माहितीची जुळवाजुळव करून प्राथमिक अहवाल बनविण्यात आला. यानुसार या दोन तालुक्यांत सुमारे १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आलेले आहे. घरांची पडझड पावसामुळे फटका घरांनाही बसला. जिल्ह्यात या आठवडाभरात सुमारे ३०० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले. मानोरा, कारंजा, मालेगाव या तालुक्यांमध्ये घरांची पडझड झाली. मानोरा तालुक्यात ५० पेक्षा अधिक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज तहसील प्रशासनाने व्यक्त केला आहे.