उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची उत्पादकता नेमकी किती? याची माहिती अजून स्पष्ट झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात पेरणी होणारे सोयाबीन उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास हेक्टरी १०, तर लातूर जिल्ह्यात हेक्टरी ११ क्विंटलच पिकल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.
खरीप २०१९-२० मध्ये पुन्हा एकदा पावसाचे खंड, अत्यल्प पाऊस व अवेळी अतिवृष्टीरूपात बरसलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. या सर्व प्रतिकूल स्थितीचा मराठवाड्यातील खरिपाच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम झाला. काही पिके वगळता इतर पिकांच्या उत्पादकतेने दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचे नुकसान अधोरेखित केले.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यात खरिपात ज्वारीची ७९७५ हेक्टरवर पेरणी झाली. तिचे हेक्टरी ३ क्विंटल ६१ किलो उत्पादन आले. ४८७७ एकरवर पेरणी झालेल्या बाजरीचे उत्पादन हेक्टरी १ क्विंटल ७२ किलो आले. मक्याची १२ हजार ७२१ हेक्टरवर लागवड झाली. त्याचे हेक्टरी ५ क्विंटल ३१ किलो उत्पादन झाले. मुगाचे हेक्टरी २ क्विंटल ६० किलो, तर ४२ हजार ३६० हेक्टरवर पेरणी झालेल्या उडदाचे उत्पादन ३ क्विंटल ३२ किलो झाले.
लातूरमध्ये हेक्टरी ६ क्विंटल ८२ किलो ज्वारी
लातूर जिल्ह्यात खरीप ज्वारीची १७ हजार ४६६ हेक्टरवर पेरणी झाली. तिचे हेक्टरी उत्पादन ६ क्विंटल ८२ किलो झाले. ४७९ हेक्टरवर असलेल्या बाजरीचे उत्पादन हेक्टरी २ क्विंटल ५६ किलो आले. मुगाची ५९९६ हेक्टरवर पेरणी झाली. त्याचे हेक्टरी ४ क्विंटल २६ किलो उत्पादन झाले.
उडदाची पेरणी ४६४० हेक्टरवर, तर उत्पादन हेक्टरी ५ क्विंटल २४ किलो झाले. सोयाबीनची लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख ८ हजार १६४ हेक्टरवर पेरणी झाली. त्याचे हेक्टरी ११ क्विंटल १० किलो उत्पादन मिळाले. कापूस व तुरीप्रमाणेच लातूर जिल्ह्यातील मका पिकाचेही नेमके उत्पादन किती? याची माहिती येणे बाकी असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.