उष्ण, कोरड्या वातावरणात होतेय वाढ
गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेतील अनेक प्रांतांमध्ये उष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये वेगाने वाढ हाेत आहे. त्याचा फटका पिकांचे उत्पादन, अन्नधान्यांच्या अस्थिर किमती आणि वणव्यांचे वाढते प्रमाण या स्वरूपामध्ये बसत आहे. याविषयी स्टॅनफोर्ड येथील संशोधकांनी या वाढत्या धोक्याचा सर्वांगीण अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष सायन्स अॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. वातावरणातील बदलांचा धोका आता प्रत्येकाच्या दारापाशी येऊन थांबल्याचे हवामान तज्ज्ञ सातत्याने सांगत आहेत. मात्र, या धोक्याचा अंदाज अद्यापही सर्वसामान्यांना येत नाही. या विषयी माहिती देताना संशोधकांनी सांगितले, की २० शतकाच्या मध्यापासून होत गेलेल्या सरासरी बदलाच्या तुलनेमध्ये उष्णता आणि कोरडेपणाचे प्रमाण काही प्रांतांमध्ये दुपटीने वाढले आहे. या वर्षामध्ये कृषी प्रक्षेत्रामध्येही उष्णतेचे प्रमाण वाढत गेले, त्यामुळे काही ठिकाणी उत्पादनामध्ये वाढ झाली, तर काही ठिकाणी उत्पादनामध्ये घट झाली. स्टेनफोर्ड च्या भू, ऊर्जा आणि पर्यावरणशास्त्र विद्यालयातील प्रो. नोआह डिफेनबॉग यांनी सांगितले, की जेव्हा आपण पिके आणि कुरणातील उत्पादनाचा ऐतिहासिक माहिती पाहतो, त्या वेळी हवामानातील बदलामुळे जवळच्या दोन प्रांतांमध्ये फारसा फरक दिसत नाही. अशा दोन ठिकाणामध्ये साधारण समान परिस्थिती असे. जागतिक बाजारपेठेतील सौद्यावरून स्थानिक तीव्र स्थितीची माहिती मिळू शकते. जागतिक तापमानामध्ये वाढीच्या स्थितीमध्ये वातावरणातील तीव्रतेचा धक्काही वाढत आहे.
भविष्यामध्ये एकाच वेळी अनेक प्रांतांमध्ये कमी उत्पादनाची शक्यता दिसत आहेत. काही अन्नधान्यासाठी वाढते तापमान काही प्रमाणात विशेषतः वाढ आणि पक्वता लवकर येण्याच्या दृष्टीने चांगले ठरत आहे. मात्र, सलग कोरडे दिवस आणि रात्रीतून वाढणारी उष्णता याचा महत्त्वाच्या पिकांच्या उदा. गहू, भात, मका आणि सोयाबीन यांच्या उत्पादनामध्ये घट दिसत आहे.वातावरणातील बदलांचे परिणाम कृषी क्षेत्राव्यतिरिक्त अन्य बाबींमध्ये दिसत आहेत. उष्ण आणि कोरड्या वातावरणामुळे परिसरातील गवत वाळून आगीचा धोका वाढू शकतो. पूर्वी ही भीती केवळ शरद ऋतू आणि उन्हाळ्यामध्ये होती, ती अन्य ऋतूमध्ये राहू शकते. या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यांमध्ये कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या वणव्यांमध्ये सुमारे २.४ लाख एकर क्षेत्र जळून गेले.१९ शतकाच्या अखेरपासून जागतिक तापमानामध्ये होत असलेली वाढ ही १ अंश सेल्सिअस किंवा १.८ अंश फॅरनहिट इतकी आहे. जर ती सर्वत्र एक सारखी असेल, तर कोणत्याही दोन ठिकाणी ती एकाच वेळी सारखी झाली असती किंवा व्हावयास हवी. मात्र, यामध्ये अनियमितता मोठी आहे.तापमानातील बदलामुळे त्यावर अवलंबून अनेक गोष्टी (उदा. पाऊस) बदलतात. हे बदल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात. यातील नेमका संबंध जुळवणे ही संख्याशास्त्रीय आव्हान ठरत आहे.सामाजिक किंवा आर्थिक फायद्यासाठी मानवाकडून कर्ब उत्सर्जनामध्ये वाढ झाली. या मानवनिर्मित जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणातील अनेक घटकांची तीव्रता बदललेली आहे. प्रत्येक घटकांचे प्रमाण वेगवेगळे असून, त्यावर संशोधकांना अधिक संशोधन करावे लागणार असल्याची माहिती संशोधक अली सरहदी यांनी दिली. तीव्र वातावरणाची सवय करावी लागेल...
गेल्या शतकांतील तापमानाच्या माहितीचा वापर अभ्यासासाठी करण्यात येत आहे. त्याच्या विश्लेषणातून १९८० पूर्वी, एकाच वर्षामध्ये दोन प्रांतांमध्ये तीव्र तापमान अनुभवण्याचे प्रमाण पाच टक्क्यापेक्षाही कमी होते. हे तीव्र तापमान दोन्ही प्रांतांसाठी बहुतांश समान असे. मात्र, गेल्या दोन दशकांमध्ये तीव्र वातावरणाचे प्रमाण २० टक्क्यापर्यंत वाढले आहे.उदा. चीन आणि भारत हे दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि जगातील सर्वाधिक कृषी उत्पादक असलेले देश. येथे पावसाचे प्रमाण कमी होत असून, एकाच वर्षात उष्ण वातावरण अनुभवास येत आहे. १९८० पूर्वी हे प्रमाण केवळ ५ टक्के होते, ते वाढून आज १५ टक्क्यांवर पोचले आहे. असे बदल पूर्वी मर्यादित होते, त्यात अलीकडे नियमितता येत आहे. हे जागतिक तापमानावाढीचेच पुरावे असल्याचे मत डिफेनबॉग यांनी सांगितले.२० व्या शतकाच्या मध्यापासून सामान्यतः सरासरी तापमानामध्ये वाढ झाली. हे प्रमाण अनेक प्रांतांमध्ये ७५ टक्क्यांइतके अधिक आहे. खऱ्या धोक्याच्या नियंत्रणासाठी
जागतिक तापमानातील बदलांमुळे अधिक तापामन, वेगवान वारे आणि कमी आर्द्रता यांचा सामना अनेक प्रांतांना करावा लागणार आहे. येणाऱ्या आपत्तीच्या नियंत्रणाचा ताण पायाभूत सुविधांवर नक्कीच येणार आहे. वादळे, वादळी वाऱ्यासह पाऊस, चक्रीवादळे, वाऱ्याचे विविध पॅटर्न, आर्द्रतेची पातळी यातून पुरांसारख्या आपत्तीमध्ये वाढ होऊ शकते.बदलते हवामान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्याचे आव्हान धोरणकर्त्यांसमोर असणार आहे. या घटनांचा अचूक अंदाज मिळवणे हेही आव्हान पेलावे लागणार आहे.