1. कापूस वायद्यांमध्ये आज काहीशी नरमाई आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दुपारपर्यंत ८७ सेंट प्रतिपाऊंडवर होता. तर देशातील वायदे आज ६१ हजारांवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र स्थिर होता. कापसाला सध्या ७ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा देशातील उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने पुढील काळात कापसाला चांगला भाव मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
2. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात सतत चढ उतार दिसत आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १३.१८ डाॅलरवर होते. तर सोयापेंडने ३९१.४५ डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशातील सोयाबीनची मागणी आणि पुरवठा तसेच खाद्यतेल बाजाराची स्थिती पाहता सोयाबीन दर टिकून राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
3. पपईला सध्या बाजारात चांगला भाव मिळत आहे. आधी श्रावणमास आणि आता गणपती उत्सव यामुळे पपईला चांगला उठाव आहे. मात्र बाजारातील पपईची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळे सध्या पपईला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते २ हजारांचा भाव मिळत आहे. पुढील काळातही बाजारातील पपईची आवक मर्यादीतच राहण्याचा अंदाज आहे. यामुळे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
4. बाजारातील टोमॅटोचे भाव अद्यापही दबावातच आहेत. बाजारातील आवक वाढलेली असून उठाव मात्र वाढला नाही. यामुळे दरावर दबाव आल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ६०० ते ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र टोमॅटोचा किमान भाव पुढील काही दिवसांमध्ये थोडा आणखी वाढू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
5. मागील हंगामात घटलेले उत्पादन आणि निर्यातीला असलेली मागणी, यामुळे जिऱ्याच्या भावात चांगली तेजी आली. जिऱ्याच्या भावात चालू हंगामात सुरुवातीपासूनच वाढ होत गेली. मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस आणि एप्रिल महिन्यातील उष्णतेमुळे जिरा पिकाचे नुकसानही झाले. गुजरात आणि राजस्थान जिरा उत्पादनाचे हब आहे. या दोन्ही राज्यांमध्ये पिकाचे नुकसान झाले होते. जानेवारीत आंतरराष्ट्रीय मसाले परिषदेत भारतातील जिरा उत्पादन गेल्यावर्षीच्या ४ लाख १४ हजार टनांवरून यंदा ३ लाख ८८ हजार टनांवर स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली गेली. तर जागतिक जिरा उत्पादन ४ लाख टनांवर स्थिरावेल, असाही अंदाज व्यक्त केला गेला. मागील हंगामात जिरा उत्पादन ४ लाख ३५ हजार टनांवर उत्पादन झाले होते. यंदा जागतिक बाजारात भारतातून जिऱ्याचा पुरवठा ७ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. गुजरातमधील जिरा उत्पादन जवळपास ९.३ टक्क्यांनी कमी झाले. यंदा गुजरातमधील उत्पादन २ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. भारताबरोबरच सिरिया आणि चीनमधूनही जिरा निर्यात कमी झाली. या दोन्ही देशांमध्येही उत्पादनाला फटका बसला. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जिऱ्याचे भाव तेजीत आले. पण जिऱ्याचे भाव वाढल्याने नफावसुलीचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे जिऱ्याच्या भावात चढ उतार सुरु आहेत. सध्या वायद्यांमध्ये जिऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ६० हजार रुपये भाव मिळत आहे. तर बाजार समित्यांमधील भावपातळी ५५ हजार ते ५६ हजारांच्या दरम्यान आहे. पुढील काळात सणांमुळे जिऱ्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.