Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीन दर वाढीसाठी अनुकूल स्थिती

सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या संभ्रमात आहेत. सोयाबीनचे दर वाढतील की नाही, ही शंका त्यांना सतावू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांचा धीर सुटू लागला आहे.

Team Agrowon

Soybean Market Rate पुणे ः सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या संभ्रमात आहेत. सोयाबीनचे दर (Soybean Rate) वाढतील की नाही, ही शंका त्यांना सतावू लागली आहे.

अनेक शेतकऱ्यांचा धीर सुटू लागला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सहा हजार रुपये क्विंटल भाव असताना सोयाबीन (Soybean Market) विकला नाही, ते आज ५००० रुपयांना सोयाबीन विकत आहेत.

पुढच्या काळात भाव आणखी कमी होईल का, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे आता सोयाबीन विकण्यासाठी झुंबड सुरू झाली आहे.

त्याचा फायदा व्यापारी घेत आहेत. पण याबद्दल नेमकी वस्तुस्थिती काय आहे, भाव वाढणार की अजून पडणार, याची माहिती जाणून घेतली पाहिजे.

सध्या बाजारात व्यापारी आणि शेतकरी यांच्यात एक प्रकारचे शीतयुद्ध सुरू आहे. ही खरे तर संयमाची परीक्षा आहे. कोण किती दिवस कळ काढू शकेल, यावर कोण जिंकणार आणि कोण हरणार ते ठरेल.

हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी बाजी मारली होती. कमी किमतीत सोयाबीन विकायला त्यांनी नकार दिला.

अपेक्षेएवढा भाव मिळेपर्यंत सोयाबीन विकणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. माल स्टॉक करून ठेवला. त्यामुळे व्यापाऱ्यांची गोची झाली. त्यांना भाव वाढवणं भाग पडले.

पण आता चेंडू व्यापाऱ्यांच्या कोर्टात आहे. सगळे घटक सोयाबीनमधल्या भाववाढीला अनुकूल आहेत, पण तरीही व्यापाऱ्यांनी ताणून धरल्यामुळे भाव वाढताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांनी जर लवकर नांगी टाकली तर व्यापाऱ्यांचे फावणार आहे.

आधी सोयाबीनच्या बाजारातले मूलभूत घटक कोणती दिशा दाखवतात ते बघूया. पहिली गोष्ट म्हणजे आता सोयाबीनच्या दराला फटका बसलाय तो खाद्यतेलातील नरमाईमुळे.

केंद्र सरकारने बेसुमार आयातीचा सपाटा लावल्यामुळे खाद्यतेलाचे दर पडले. त्यात यंदा मोहरीचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज सरकारने वर्तवला होता.

गेल्या वर्षी मोहरीला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे उत्तरेकडच्या राज्यांमध्ये यंदा शेतकऱ्यांनी मोहरीचा पेरा मोठ्या प्रमाणावर वाढवला. मोहरीचे विक्रमी उत्पादन झाले तर मोहरीच्या तेलाची उपलब्धता वाढणार.

मोहरीत सोयाबीनच्या तुलनेत तेलाचे प्रमाण जास्त असते. मोहरी तेलाचा पुरवठा वाढला की त्याचा दबाव सोयातेलावर येतो. त्याचा थेट परिणाम म्हणजे सोयाबीनच्या दरात नरमाई.

परंतु गेल्या काही दिवसांत उत्तर भारतात तापमान वाढले आहे. पुढील काही दिवसांत उष्णता वाढत जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्याचा फटका मोहरीच्या पिकाला बसणार आहे. त्यामुळे मोहरीचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज हुकणार आहे.

आता फार तर गेल्या वर्षीइतकेच उत्पादन होईल, असा सुधारित अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा थेट फायदा सोयाबीनला होणार आहे. तसेच पामतेलाचे दर आता वाढू लागले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचे पडसाद भारतातील स्थानिक बाजारांतही उमटताना दिसत आहेत. त्याचाही फायदा सोयातेलाचे दर वाढण्यात होईल. त्यामुळे सोयाबीनला बळ मिळू शकते, असे बाजार अभ्यासकांनी सांगितले.

दुसऱ्या बाजूला सोयापेंड निर्यात वेगाने वाढत आहे. डॉलरच्या तुलनेत रूपया कमजोर झाला आहे. सोयापेंडला स्थानिक बाजारातही पोल्ट्री उद्योगाकडून मागणी चांगली आहे. सोयाबीन क्रश केल्यानंतर सोयापेंड आणि सोयातेल ही दोन उत्पादने तयार होतात.

या दोन्हींची मागणी वाढत असल्याने सोयाबीनच्या दरवाढीला बळ मिळेल, असे हे साधे गणित आहे. यातली आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे येत्या मॉन्सून हंगामात एल-निनोचे संभाव्य आगमन.

यंदा एल-निनो अवतरणार असल्याचा अंदाज हवामान संस्थांकडून व्यक्त केला जात आहे. एल निनो म्हणजे पावसाचे प्रमाण कमी आणि दुष्काळाची शक्यता जास्त. त्याचा अर्थ पुढील हंगामात सोयाबीनचे उत्पादन घटणार.

त्याचा मनोवैज्ञानिक दबाव बाजारावर लगेच दिसतो. एप्रिल-मे महिन्यांत जसजसे विविध हवामान संस्थांचे अंदाज येणे सुरू होईल, तशी एल-निनोची चर्चा वाढत जाईल. त्याचा थेट परिणाम सोयाबीनच्या किंमत पातळीवर दिसेल.

हे सगळे मूलभूत घटक लक्षात घेतले तर सोयाबीनच्या दरात तेजी यायला पाहिजे. पण सध्या व्यापाऱ्यांनी ताणून धरल्यामुळे दर दबून आहेत. सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी ५००० ते ५३०० रुपये क्विंटल दर मिळत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी धीर सोडल्यामुळे बाजारात सध्याच्या दरात सोयाबीनची आवक सुरू आहे. शेतकऱ्यांनी या दराला सोयाबीन बाजारात आणणे सुरूच ठेवल्यास ते व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडणार आहे.

५५०० पेक्षा कमी दरात विकू नका

देशातील आणि जागतिक बाजारातील स्थिती लक्षात घेता पुढील काही दिवसांत सोयाबीनच्या दरात निश्चित वाढ होणार आहे. शेतकऱ्यांनी घायकुतीला येऊन आता सोयाबीन विकले तर व्यापाऱ्यांची चांदी होईल.

अनेक व्यापारी स्वस्तात सोयाबीन खरेदी करून एप्रिल-मे मध्ये दरात मोठी तेजी आल्यानंतर ते विकून नफेखोरी करतील, असा अभ्यासकांचा वहीम आहे.

शेतकऱ्यांनी या सगळ्या स्थितीचा विचार करून सोयाबीन विक्रीबद्दल निर्णय घ्यावा; सोयाबीन ५५०० रूपयांपेक्षा कमी दराने विकू नये, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Crop Loan: बॅंकांनी पीककर्ज प्रकरणांत सकारात्मकता ठेवावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

Maharashtra Sugar Industry: हंगामाच्या ५० दिवसांनंतरही सात कारखान्यांचे दरावर मौन

MPKV MoU Signed: कृषी विद्यापीठाचा ‘कार्डियन करेक्ट’शी करार

Honey Village Scheme: ‘मधाचे गाव’ योजना देणार रोजगाराचा गोडवा

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

SCROLL FOR NEXT