Nagar News : यंदा कापसाचे उत्पादन कमी होण्याच्या अंदाजानुसार कापसाला चांगला दर मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अद्याप तरी कापसाला कमीच दर आहे. सध्या कापसाला सात ते सात हजार तीनशे रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे दिसून येत आहे. सरकारी खरेदी सुरू नसल्याने खाजगी व्यापाऱ्याकडूनच कापूस खरेदी केला जात आहे.
नगर जिल्ह्यात या वर्षी पाऊस नसल्याने खरिपातच पेरण्यासह कापूस लागवडीला अडचणी निर्माण झाल्या. मात्र बहुतांश भागात कमी पावसावरच कापसाच्या लागवडी उरकल्या. शेवगाव, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहुरी, कर्जत भागांत कापसाचे क्षेत्र अधिक आहे. गेल्या वर्षी कापसाला सात ते नऊ हजारांपर्यंत दर मिळाला. दराची वाट पाहत शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला, मात्र शेवटपर्यंत दर मिळाला नसल्याने हिरमोड झाला.
यंदाही कापसाला कमीच दर आहे. नगर जिल्ह्यात शासनाने अजून सरकारी कापूस खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी सुरू आहे. सध्या ७ हजार २०० ते ७ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. यंदाही कापसाला चांगला दर मिळण्याची आशा आहे. अजून फारसा कापूस विक्रीला येत नसला तरी खाजही व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली आहे. यंदा मात्र दरवर्षीच्या तुलनेत कापसाच्या उत्पादनात मात्र पंचवीस ते चाळीस टक्के घट होण्याचा अंदाज आहे.
सध्या कापसाची वेचणी सुरू आहे. पहिल्या व दुसऱ्या वेचनीला प्रति किलो १० रुपये द्यावे लागले. आता बऱ्याच भागांत तिसरी, चौथी वेचणी सुरू आहे. तिसऱ्या व चौथ्या वेचणीला पंधरा रुपये किलोपर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. लागवड, खुरपणीची मजुरी आणि आता वेचनीची मजुरीही वाढली आहे. वेचनीला मजूर मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. १२ ते १५ रुपयांपर्यंत किलोला दर देऊनही मजुरांच्या ने-आण करण्यासाठी लागणारा खर्चही शेतकऱ्यांनाच करावा लागत आहे. खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याने यंदाही कापसाचे पीक तोट्यातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कापूस चोरीचेही संकट
नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत कापसाची चोरी होण्याचे प्रकार सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कापूस चोरांनी एका शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. एक तर अत्यल्प पावसामुळे आधीच कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यातच शेतातील कापसाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. हताश झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर शेतातील कापसाची राखण करण्याची वेळ आली आहे.
कपाशीच्या पिकासाठी खूप खर्च केला. परंतु पाण्याअभावी कापसाचे पीक हातचे गेले आहे. दोन-तीन वेचणीत कपाशीचे पीक संपणार असून, सध्या झाडाला कापूस फुटला आहे. परंतु कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने फुटलेल्या कापसाच्या वेचणीस उशीर होत असून, यामुळे कापसाच्या वजनात घट येणार आहे.दशरथ शेळके, शेतकरी, शहर टाकळी, ता. शेवगाव, जि. नगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.