Cotton Market
Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस दरवाढीसाठी आणखी किती वाट पाहावी लागणार?

Anil Jadhao 

Cotton Production Update : देशातील कापूस उत्पादनात (Cotton Production) यंदाही घट झाली. गेल्यावर्षीप्रमाणं मोठ्या तेजीच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी यंदा कापूस मागं ठेवला. पण फेब्रुवारीपासून बाजारावर आवकेचा दबाव असल्यानं दर हंगामातील निचांकी पातळीवर आहेत. बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर कापूस दरात वाढ होईल, असा अंदाज आहे.

खुद्द काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनीही याबाबत सांगितलं. त्यामुळं पुढील काळात कापसाची बाजारातील आवक कमी होऊन दरात सुधारणा होण्याचा अंदाज आहे.

देशातील बाजार मागील अडीच महिन्यापासून दबावात असण्याचं मुख्य कारण म्हणजे आवकेचा दबाव. शेतकरी म्हणतात की, आम्ही यंदा कापूस जास्त दिवस ठेवला. त्यामुळं चांगला भाव मिळायला हवा होता.

तुम्हीही शेतकऱ्यांनी ८५०० रुपयांपेक्षा कमी भावात कापूस विकू नका असं सांगत होते. शेतकऱ्यांचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे. कारण हंगामाच्या सुरुवातील शेतकऱ्यांनी तीन महिन्यांपर्यंत कापसाची कमी विक्री केली.

देशातील उत्पादन तर कमी होतचं. फक्त उद्योगांनी आता मान्य केलं. त्यामुळं बाजारभावही टिकून होते. पण शेतकरी जास्त दिवस कापूस साठवून ठेऊ शकत नाहीत.

सोयाबीन किंवा तुरीप्रमाणं कापूस साठवणं सोप नाही. अनेक अडचणी येतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी फेब्रुवारीपासून कापूस विक्री सुरु केली. बाजारातील आवक वाढल्यानं दर कमी झाले. अनेक जाणकारांच्या मते यंदाच्या हंगामात कापसाचे भाव कमी होण्यासाठी इतर घटक जास्त कारणीभूत नाहीत.

शेतकरी जास्त दिवस कापूस ठेऊ शकत नाहीत, त्यांना कापूस विकावाच लागतो. त्यामुळं बाजारात आवक वाढली आणि दर दबावात आले. चालू महिन्यात कापूस दरात २०० रुपयांपर्यंत वाढ झाल्यानंतर आवक पुन्हा वाढली. काही बाजारांमध्ये तर विक्रमी कापूस खरेदी झाली.

पण आता शेतकऱ्यांकडे कमी कापूस आहे. एप्रिलच्या मध्यानंतर कापूस आवक कमी होईल, असा अंदाज होता. पण आताही कापूस विक्री मोठ्या प्रमाणात होतेय. बरेच शेतकरी सांगतात की, आमच्या भागात शेतकऱ्यांकडे कापूस नाही.

पण अनेक भागातील शेतकरी दरवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. तर काही शेतकरी आता कापूस विकत आहेत. लवकरच बाजारातील आवकही कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं दरातही वाढ होईल, असं व्यापारी, उद्योग आणि जाणकारही सांगत आहेत.

काॅटन असोसिएशनचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनी एका मुलाखतीत देशातील कापसाचे भाव पुढील काळात १५ ते २० टक्क्यांनी वाढतील असा अंदाज व्यक्त केला.

जागतिक पातळीवर कापड बाजारात मंदी दिसते. पण देशात वापर चांगला आहे. त्यामुळं मिल्सकडून कापसाला मागणीही वाढली. सध्या कापसाची आवक चांगली होतेय. रुईचे भावही प्रतिखंडी ६२ हजार ते ६३ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.

पण मे महिन्यांतर कापसाची आवक कमी होईल आणि दर वाढत जातील. रुईचे भाव जून किंवा जुलैमध्ये ७० ते ७५ हजार रुपये खंडीवर पोचतील, असा अंदाज आहे, असेही गणात्रा यांनी सांगितले.

भारताचा कापूस वापर जास्त असल्यानं यंदा निर्यातही कमी होऊन २५ लाख गाठींवर स्थिरावेल, असंही गणात्रा यांनी सांगितलं. कापसाची टंचाई भासण्याचाही अंदाज आहे. त्यामुळं भारताला कापूस आयात वाढवावी लागेल.

निर्यातीचा विचार करता भारतानं मार्चपर्यंत १२ लाख गाठी कापूस निर्यात केला. चीन आणि बांगलादेशमध्ये सध्या मंदीची स्थिती आहे. पण भारतीय मिल्सकडे मागणी चांगली आहे. या दोन्ही देशांची मागणी भारताकडे येऊ शकते. त्यामुळं भारतीय उद्योगांना संधी असेल, असेही गणात्रा यांनी सांगितले.

तसेच देशातील उद्योग पूर्ण क्षमतेने आणि फायद्यात काम करत आहेत. त्यामुळं त्यांनी कापूस खेरदी करून ठेवावा, असा सल्लाही दिला.

कापसाचे भाव वाढतील याचे स्पष्ट संकेत गणात्रा यांनी दिले. मागील हंगामातही बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतरच दरातील तेजी वाढली होती. आता तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल की यंदाही आम्हाला फसवलं. पण चालू हंगामाचाच विचार केला तर बाजाराची स्थिती लक्षात येईल.

पहिल्या तीन महिन्यांमध्ये कापसाची विक्री कमी होती. त्यामुळं कापूस दर सरासरी ८५०० रुपयांच्या दरम्यान होते. पण जशी कापूस विक्री वाढत गेली म्हणजेच बाजारातील आवक वाढली तर दबावात आले. देशातील उत्पादन घटलं. पण कमी दिवसांमध्ये जास्त कापूस बाजारात आला. त्याचा दबाव बाजारावर जाणवला. कारण किती उत्पादन झालं हे जेवढं महत्वाचं तेवढचं महत्वाचं आहे की हे उत्पादन किती दिवसांमध्ये बाजारात आलं.

बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर दर वाढतील, हे आता सर्वांनीच मान्य केलं. पण तोपर्यंत किती शेतकरी थांबतील हा कळीचा मुद्दा आहे. कारण अनेक शेतकरी इच्छा असूनही थांबू शकत नाहीत. कापूस साठवणुकीतील अडचणी, तोंडावर आलेली खरिपाची लागवड यामुळं शेतकरी कापूस विकत आहेत.

सध्या कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपये भाव मिळतोय. पुढील काळात कापूस आवक कमी होऊन रुईचे भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढतील, असा अंदाज अतूल गणात्रा यांनी व्यक्त केला. कपसाच्या भावातही किमान १० ते १५ टक्के वाढ होऊ शकते. पण तत्कालीन घटकांचाही दरावर परिणाम होऊ शकतो, हेही लक्षात ठेवावं.

कापूस विक्री करताना बाजाराची प्रत्यक्ष शहानिशा करावी. ऐकीवर किंवा माध्यमांमध्ये फिरत असलेल्या माहितीवरून निर्णय घेऊ नये. बाजारकडे सतत लक्ष ठेवावं आणि दराचा आढावा घ्यावा, असं आवाहनही जाणकारांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT