जल-मृदसंधारणासाठी समतल चर
जल-मृदसंधारणासाठी समतल चर 
कृषी सल्ला

शास्त्रीय पद्धतीने करा जलसंधारणाचे उपाय

डॉ. मदन पेंडके, डॉ. भगवान अासेवार

जलसंधारणासाठी करण्यात येणा­ऱ्या कृषी अभियांत्रिकी उपायांमध्ये समपातळीवरील बांध, समपातळी रेषेवरील चरी, घळी नियंत्रण बांधकाम, नाला बांध, गॅबियन, सिमेंट बंधारे, नाला सरळीकरण, शेततळ्याचा समावेश होतो. शास्त्रीय पद्धतीने या उपाययोजना कराव्यात. घळी नियंत्रण ः

  • शेतातील छोट्या दगडांचा बांध किंवा झाडांच्या फांद्या एकावर एक अशारीतीने रचून घळीमध्ये उभारून घळींची होणारी वाढ व संभाव्या नुकसान टाळता येऊ शकते.
  • बांधामुळे पावसाचे पाणी एका ठिकाणी केंद्रित केले जाते, त्यामुळे बांधाला जर खिंडार पडले असेल, तर ते ताबडतोब दुरुस्त करावे.
  • समपातळी बांध ः

  • शेतीमध्ये वाहते पाणी थोपविण्यासाठी दगडाचे किंवा मातीचे बांध समपातळी रेषेवर तयार करतात.
  • बांध-बंदिस्ती कमी पावसाच्या प्रदेशात, हलक्या ते मध्यम प्रतीच्या व कमी उताराच्या ०.५ ते ३ टक्के उतार असलेल्या जमिनीत करावी. यामुळे वाहणारे पाणी अडते, जमिनीची धूप थांबते.
  • ढाळीचे बांध ः हे बांध मध्यम उताराच्या ३ ते ७ टक्के उतारावर भारी जमिनीमध्ये पाणी थोपविण्यासाठी व धूप कमी करण्यासाठी बांधतात. समपातळीवरील चरी ः

  • जास्त उतार असलेल्या वरच्या व हलक्या जमिनीस समपातळी रेषेवर चरी खोदण्यात येतात.
  • चरातील माती खालच्या बाजूला टाकतात. पावसाचे वाहत येणारे पाणी याच च­रीमध्ये साठते, त्यामुळे झाडांच्या मुळांना ओलावा मिळतो.
  • चर ४ ते ५ मीटर लांब, ४० ते ५० सें.मी. रुंद व ४० ते ६० सें.मी. खोल, सलग किंवा एक सोडून एक अशा पद्धतीने खोदतात.
  • फळझाडे किंवा वनवृक्षांची लागवड च­राच्या काठावर केल्यामुळे झाडांना सतत ओलावा मिळतो, त्यांची चांगली वाढ होते. या चरांमुळे वाहत्या पाण्याचा वेग अतिशय कमी होतो. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर कमी करता येते.
  • नाला सरळीकरण ः

  • शेतातून एखादा नाला वाहत असेल तर त्याचे सरळीकरण करणे आवश्यक आहे. कारण जास्त पाऊस झाल्यास नाल्यातील पाणी काठच्या जमिनीतून वाहून जमिनी खराब होतात. हे टाळण्यासाठी नाल्याला योग्य दिशा द्यावी लागते.
  • नालापात्रातील अडथळे दूर करावेत, खोली व रुंदी कमी- जास्त करावी. गरज असेल तर पुष्टी बांध घालावेत.
  • नाला बंडिंग ः

  • नाल्याच्या पात्रात आडवे मातीचे बांध घालतात, यालाच नाला बंडिंग म्हणतात.
  • नाल्याच्या पात्रातून वाहत येणारे पावसाचे पाणी या बांधाला अडते, तेथे बराच काळ साठून राहते. हे पाणी हळूहळू जमिनीत झिरपते. त्यामुळे सभोवतालच्या क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होते.
  • नाला बंडिंगमुळे खालच्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढून जलसिंचनाचे क्षेत्र वाढते. पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • जमिनीची खोल मशागत

  • कोरडवाहू शेतीत पावसाचे पाणी जमिनीमध्ये जास्त प्रमाणात मुरविण्यासाठी खोल नांगरट करणे महत्त्वाचे ठरते. खोल नांगरटीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी वाहण्याचे प्रमाण कमी होऊन शेतात पाणी जास्त मुरते.
  • लोखंडी नांगराने २० ते २५ सें.मी. एवढी खोल नांगरट करावी.
  •  पाझर तलाव ः

  • पाझर तलाव म्हणजे नैसर्गिक नाला अथवा ओढ्यावर आडवा बांधलेला आणि पाणलोट क्षेत्रातून गोळा होणारा प्रवाह अडवून, तो जास्तीत जास्त दिवस साठवून, जमिनीत मुरवून त्या क्षेत्रातून भूजलाची पातळी वेगाने वाढविणा­ऱ्या बंधा­ऱ्यामुळे तयार होणारा जलाशय.
  • अशा प्रकारचा बंधारा बांधण्यात आला तर पाणलोट क्षेत्रात वाहून जाणारे पाणी अडविले जाऊन शेताकरिता व त्या क्षेत्रातील भूजल पुनर्भरणाकरिता त्याचा वापर होऊ शकतो.
  • पाझर तलावांमुळे पाण्याबरोबर वाहून जाणारी सुपीक मातीदेखील अडविली जाते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी दुष्काळी प्रदेशात पाझर तलावाचे बांधकाम करतात.
  • पाझर तलावाचे बांधकाम अशा पद्धतीने करावे, की पावसाळ्यात तलाव संपूर्ण भरावा आणि हिवाळ्यापर्यंत सर्व पाणी पाझरून आजूबाजूच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते.
  • ज्या ठिकाणी पाझर तलावाचे बांधकाम असते, त्या ठिकाणी जमिनीचा थर पाझरास योग्य असावा लागतो.
  • पाझर तलावांचे नियोजन ः

  • पाझर तलावाचे मुख्य कार्य म्हणजे त्यामध्ये साठविलेले पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे. पाझर तलाव हा सच्छिद्र भूभागावर बांधला तरच त्याचे फायदे मिळतात. म्हणून पाझर तलाव हा एखाद्या भारी अथवा अभेद्य जमिनीवर बांधू नये, की ज्यामुळे पाझर तलावाच्या मुख्य कार्यालाच बाधा होईल.
  • पाझर तालाव अशा ठिकाणी बांधावा, की जेथील जमिनीचा वरचा थर सच्छिद्र असेल आणि त्याखालचा कमीत कमी तीन मीटर जाडीचा थर हा जास्तीत जास्त झिजलेला असेल. अशा प्रकारच्या जमिनीवर बांधलेल्या तलावामुळे भूजल पुनर्भरणाचा वेग वाढतो.
  • पाझर तलावाच्या खालच्या बाजूला अथवा परिणाम क्षेत्रात पिकायोग्य जमीन मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. या भागात अनेक विहिरी असणे अथवा नवीन विहिरी खोदण्यालायक क्षेत्र असणे गरजेचे आहे, जेणेकरून त्या भागाला सिंचनाखाली आणणे सहज शक्य होईल.
  • लहानात लहान पाझर तलावाच्या क्षेत्राची लांबी एक कि.मी. असते.
  • पाझर तलावामध्ये जास्त होणारे पाणी काढून टाकण्यासाठी सांडव्यांची साधी-सोपी, आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि कार्यक्षम व्यवस्था करता येणे भौगोलिकदृष्ट्या शक्य असावे.
  • पुरेशा सच्छिद्र भूस्तरावर पाझर तलाव बांधताना तो एखाद्या खोल दरीसारख्या भागात बांधावा, जेणेकरून खोल तळे तयार होईल, पाणी कमीत कमी क्षेत्रावर पसरेल. उथळ तळ्यापेक्षा असे खोल तळे तयार केल्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे ऊन, वा­ऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे पाण्याचे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. कमीत कमी जमीन पाण्याखाली बुडते. दुसरा फायदा म्हणजे तलावातील पाणी अडविण्याकरिता निवडलेले क्षेत्र जर पुरेसे सच्छिद्र नसेल तर त्याचे साठवण क्षेत्र वाढवावे, ज्यायोगे अधिक पाणी जमिनीत मुरू शकेल.
  • ज्या पाणलोट क्षेत्रामधून पाझर तलावामध्ये पाणी येणार आहे, त्यात योग्य प्रमाणात झाडीझुडपे व गवत असावे, ज्यामुळे मातीची धूप होणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था नसेल, तर त्या पाणलोट क्षेत्रात मृद्‍संधारणाची कामे हाती घ्यावीत, अन्यथा ती वाहून आलेली माती पाझर तलावात साठून त्याची साठवणक्षमता कमी होऊ शकते.
  • पाझर तलावाचा भराव तयार करण्याकरिता योग्य प्रकारची माती व इतर बांधकाम साहित्य त्या क्षेत्रातच उपलब्ध होणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. बाहेरून साहित्य वाहून आणून भराव तयार करण्यामुळे खर्चात अनावश्यक वाढ होऊ शकते.
  • संपर्क ः डॉ. मदन पेंडके ः ९८९०४३३८०३ (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT